कोणावरही येऊ नये अशी वेळ! लग्नानंतर २ महिन्यांतच आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:50 IST2026-02-03T10:47:08+5:302026-02-03T10:50:32+5:30
२ महिन्यांपू्र्वी लग्न झालं अन् डोक्यावरून आईचं छत्र हरपलं; खचून गेली अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...

कोणावरही येऊ नये अशी वेळ! लग्नानंतर २ महिन्यांतच आईचं निधन, मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट
Bhagyashree Nhalve Emotional Post: मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेच्या आईचं निधन झालं. अलिकडेच सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीने चाहत्यांनी हा माहिती दिली होती. गेल्या वर्षभरापासून त्या आजारपणाशी झुंज देत होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक तिच्या आईची तब्येत अधिकच खालावली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. आईच्या निधनामुळे अभिनेत्री पुरती खचून गेली आहे. आईच्या निधनानंतर भाग्यश्री न्हालवेने सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे.
२ डिसेंबर २०२५ रोजी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने पेशाने डॉक्टर असलेल्या तरुणासोबत लग्नगाठ बांधली होती. दोन दिवसांपूर्वी भाग्यश्रीच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून भाग्यश्रीची आई आजारी होती. आईसोबत राहता यावं म्हणून तिला लग्नच करायचं नव्हतं. मात्र आईची अखेरची इच्छा होती की आपल्या डोळ्यासमोर लेकीचं लग्न बघावं. भाग्यश्री न्हालवे तिच्या आईच्या खूप जवळ होती. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या आईच्या आठवणीत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. "आई...! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आई ने मला एकही फोन केला नाही. का तर "सासरी गेलेल्या मुलीला आई ने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही." अशा मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली. आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही.लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाहीत पण तू मला सोडून गेलीस. हे मला मान्य होत नाहीये.मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी रहायचा होत म्हणून मला लग्न न्हवत करायचं.पण तू....! ,"माझी शेवट ची इच्छा आहे राणा तू माझ्या साठी लग्न कर, आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्ती केलं आहेस. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी" खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आईची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्यासाठी किती बरोबर आहे."
त्यानंतर पुढे भाग्यश्री म्हणते, "तुझ्या साठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिले.माझा संसार पाहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग ? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्या साठी प्रार्थना करायचे...पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणा सोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते. मला तू अशी सोडून जायला नको होतीस. तुला सगळं उपजत होत आई. म्हणून तू माझी सोय करून गेलीस.आई ला लेकराच चांगलाच कळत हे खरच,पण तरीही आई तू मला हवी होतीस.आता मला कोण राणा म्हणेल.मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्या प्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे." अशा आशयाची पोस्ट भाग्यश्रीने लिहिली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून प्रेक्षकांचे डोळे देखील पाणावले आहेत.