"आताच्या अस्थिर परिस्थितीमध्ये...", ऐश्वर्या नारकर यांचं मानसिक आरोग्याबद्दल भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:05 IST2025-04-22T13:01:21+5:302025-04-22T13:05:22+5:30
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नकळतपणे शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं.

"आताच्या अस्थिर परिस्थितीमध्ये...", ऐश्वर्या नारकर यांचं मानसिक आरोग्याबद्दल भाष्य
Aishwarya Narkar: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नकळतपणे शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं. अलिकडे मानसिक आरोग्यावर अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. बरेच कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर भाष्य करत असतात. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी मानसिक आरोग्याबद्दल भरभरुन बोलल्या आहेत.
ऐश्वर्या नारकर यांनी 'सुमन म्युझिक मराठी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मानसिक आरोग्यावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या,"या परिस्थितीत आपल्याला कुटुंबाची गरज भासते. त्यावेळी आपली माणसं जवळ असली पाहिजे. माझ्या बाबतीत म्हणायचं तर मुळात माझ्या आवडी फार नाहीत. हे लोकांना चूक वाटत असेल. पण, त्यामुळे मला नैराश्य कमी येतं. मला घर सांभाळून इतर गोष्टी करता येतात यात मी आनंदी असते. अशा बेसिक गोष्टी असतात. पण आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या आजुबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं असं नाही. वाढत्या वयानुसार आपल्यामध्ये हार्मोनलमध्ये बदल होत असतो त्यामुळे मेंटल हेल्थमध्ये बदल होतो. पण, आपल्याला कळतंच नाही की आपल्या बाबतीत असं का घडतंय. तरीही कुठेतरी अशी एक रुखरुख भरून राहिली आहे. त्यामुळे रडावसं वाटतंय, कम्फर्टेबल वाटत नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत व्यक्त होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मित्र-मैत्रीणींमध्ये वेळ घालवल्यावर चांगलं वाटत असेल किंवा शॉपिंग केल्यावर चांगलं वाटत असेल तर एखादी फिल्म बघितल्यावर चांगलं वाटतं तर अशा गोष्टी शोधून त्यामध्ये मन रमावा."
पुढे त्यांनी म्हटलं, "सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही वाईट वेळ असली तरी ती संपतेच. मग भले ती वेळ एक किंवा दोन वर्षांनी संपेल. त्या काळात आपण स्वत: ला जपलं पाहिजे. पण, खचून जाणं उपयोगाचं नाही. असा आशावाद कायम आपण बाळगला पाहिजे. तरच आपण आताच्या या अस्थिर परिस्थितीमध्ये तरुन जाऊ शकतो.
त्यामुळे कितीही वाईट वेळ असली तरी ती संपणार आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे." असं म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी सल्ला दिला आहे.