"पहिल्यांदा नायक म्हणून...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतीची भावुक पोस्ट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:36 IST2025-05-29T16:34:14+5:302025-05-29T16:36:40+5:30
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

"पहिल्यांदा नायक म्हणून...", 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतीची भावुक पोस्ट, म्हणाला...
Hrishikesh Shelar: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. जवळपास २ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर ही मालिका ऑफ एअर झाली. दरम्यान, या मालिकेतील अक्षरा, अधिपती, भुवनेश्वरी आणि चारुहास या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. आता ही मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांसह कलाकार देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच या मालिकेत अधिपतीची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश शेलारने (Hrishikesh Shelar) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा शेवटचा भाग २५ मे या दिवशी प्रसारित करण्यात आला. ही मालिका संपताच अभिनेता हृषिकेश शेलारने मालिकेच्या निर्मात्यांसह त्याच्या चाहत्यांचे आभार मानत भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, "आपल्याला मस्त वाटत असतं, आपण बच्चन आहोत..! पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी योग्य संधी देणारे लोक हवेत. "तुला शिकवीन चांगलाच धडा" या आमच्या मालिकेचा प्रवास आता संपला."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "या मालिकेनं मला पहिल्यांदा "नायक" म्हणून घरा-घरात पोहचवलं. या मालिकेसाठी, आमच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी, निर्माते एरिकॉन फिल्मस, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई,झी मराठी वाहिनी आणि , दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड या सगळया मंडळींनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तमाम मराठी प्रेक्षकांनी 'अधिपती'ला स्वीकारलं, मनापासून प्रेम केलं म्हणून मी पहिल्यांदा 'हिरो' म्हणून उभा राहू शकलो. मजा आली..! " अशा आशयाची पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. हृषिकेश शेलारने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.