"आयुष्यातल्या खडतर प्रवासामध्ये...", लग्नाच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची पत्नीसाठी खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:19 IST2025-05-26T15:15:10+5:302025-05-26T15:19:27+5:30

मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. '

marathi actor milind gawli share special post for his wife on the occasion of their 35th wedding anniversary | "आयुष्यातल्या खडतर प्रवासामध्ये...", लग्नाच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची पत्नीसाठी खास पोस्ट 

"आयुष्यातल्या खडतर प्रवासामध्ये...", लग्नाच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची पत्नीसाठी खास पोस्ट 

Milind Gawali : मिलिंद गवळी (Milind Gawali) हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेत साकारलेल्या अनिरुद्धच्या भूमिकेमुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. तसेच त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'बेरीज वजाबाकी', 'ठण ठण गोपाळ', 'अथांग' अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. मिलिंद गवळी त्यांच्या अभिनयासह बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंमुळे चर्चेत येत असतात. नुकताच त्यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पत्नीसोबतचे खास क्षण व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत त्यावर लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. आपल्या सुखी संसाराचं गुपित सांगताना त्यांनी म्हटलंय, "आमच्या लग्नाला आज साडेतीन दशकं पूर्ण झाली , आणि आजही मला ही काल-परवाचीच गोष्ट वाटतेय, मी ज्या शाळेत शिकलो, ती जगप्रसिद्ध शाळा म्हणजे आमची शारदाश्रम विद्या मंदिर दादर, त्या शाळेच्या तळमजल्यावर दत्त मंदिर आहे, त्या मंदिराच्या अंगणात आमचं लग्न लागलं. १९९० ला माझ्या एका मित्राने कोर्टात रजिस्टर लग्न केलं होतं, आणि संपूर्ण लग्नाचा खर्च वाचून ते कपल युरोपला फिरायला गेले होते, ही Idea मला फारच भन्नाट वाटली होती, तसाही मी माणूस घाण्या होतोच, मग घरी मी सांगितलं मला रजिस्टर लग्न करायचं आहे, हे ऐकताच माझी आई म्हणाली 'बिलकुल नाही', आपल्या नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा गोतावळा खूप मोठा आहे, या सगळ्यांना बोलावल्याशिवाय लग्न होणार नाही. मी खूप समजून सांगायचा प्रयत्न केला, म्हणालो लोक लग्नाला येतात, अन्नाची नासाडी करतात, जेवणाला नावं ठेवतात, फुकट पाण्यासारखा पैसा खर्च होतो, पण माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं, दिपा सुद्धा म्हणाली विधींशिवाय कुठे लग्न होत असतं का, मला सगळ्या विधी हव्या आहेत, नाशिक त्रंबकेश्वर चे गुरुजी आमचं लग्न लावायला मुंबईला आले, मी त्यांना म्हटलं आम्हाला लग्नाचे सगळे विधी करायचे आहेत, आमच्या लग्नाचे विधी सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते,१२ तास चाललं, लग्नाला आलेले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, इतके वैतागले, कारण हे लग्न सपता संपत नव्हतं."

त्यापुढे मिलिंद गवळींनी लिहिलंय की, "आज 35 वर्ष मागे वळून बघतो, त्यावेळेला या लग्नाला हजर असलेले असंख्य जवळची माणसं, आज आमच्या मध्ये नाहीयेत, त्यातली दोन महत्त्वाची माणसं, ज्यांनी हे लग्न सुखाचे व्हावं, समृद्ध व्हावं, आम्हा दोघांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा, म्हणून भरभरून आशीर्वाद दिले होते, ती दोन माणसं म्हणजे आम्हा दोघांच्या आई.आज माझी आई आणि दिपाची आई दोघेही आमच्यात नाहीयेत, पण त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या ईश्वरावर अस्सीम भक्तीमुळे, त्या दोघांच्या शुभ आशीर्वादामुळे, आमच्या संसाराचा रथ आजही धावतो आहे, जवळजवळ नऊ वर्ष आमचं लग्न ठरलं होतं, त्यात मी जेव्हा सिनेमा क्षेत्रामध्ये career करणार आहे हे कळल्यावर, त्या दोघींना किती काळजी वाटली असेल याची आज मला जाणीव होते, दिपाची आई म्हणजे माझी सासूबाई माझ्यासाठी पाच पाच हजार स्वामींचे जप का करत होती, याची जाणीव मला आज होते आहे. आज 35 वर्ष दिपा ने मला एका डोंमबार्याला भक्कम साथ दिली, आयुष्यातल्या खडतर प्रवासामध्ये कायम पाठीशी उभी राहिली, आमच्या जीवनामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो, कायम हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत केलं. 35 वर्षाच्या माझ्या यशस्वी आणि सुखी संसाराचं सगळं श्रेय दिपाला." अशा आशयाची पोस्ट लिहून त्यांनी पत्नीसाठी प्रेमभावना व्यक्त केल्या आहेत. 

Web Title: marathi actor milind gawli share special post for his wife on the occasion of their 35th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.