करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यावर केलं भाष्य; म्हणाला, "इन्स्टाग्रामवर दिसतं ते प्रेम..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:25 IST2026-02-02T12:24:32+5:302026-02-02T12:25:19+5:30
मी तेजस्वीला भेटलो तेव्हा..., करण कुंद्रा स्पष्टच बोलला

करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यावर केलं भाष्य; म्हणाला, "इन्स्टाग्रामवर दिसतं ते प्रेम..."
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे इंडस्ट्रीतलं सर्वात क्युट कपल आहे. २०२१ साली बिग बॉस १५ मध्ये दोघं सहभागी झाले होते. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सोशल मीडियावर कायमच ते एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. तसंच काही वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. करण आणि तेजस्वी कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता नुकतंच करणने तेजस्वीसोबतच्या नात्यावर भाष्य केलं आहे.
'स्क्रीन'शी बोलताना करण कुंद्रा म्हणाला, "सोशल मीडियावर लव्ह स्टोरीबाबत कायम एक संभ्रम पसरवला जातो. मी आणि तेजस्वी एका रिएलिटी शोमध्ये भेटलो. मला अशा रिएलिटी शोबद्दल एक चांगली गोष्ट वाटते ती म्हणजे तुम्हाला समोरच्याचा स्वभाव खूप लवकर समजतो. ७-८ दिवसात सगळे फिल्टर निघून जातात. बाहेरील जगाशी काहीच संबंध येत नाही मग तो तुमचा मॅनेजर असो किंवा तुमचं कुटुंब असो. तुम्ही एकटेच असता आणि तुम्ही तसेच वागता जे तुम्हाला वाटतं. निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणारं कोणीही नसतं. ही एक प्युअप फीलिंग आहे."
तो पुढे म्हणाला, "मी सगळ्यांना सांगू इच्छितो की इन्स्टाग्रामवर तुम्हाला जे दिसतं ते प्रेम नसतं. खऱ्या आयुष्यात ते खूप वेगळं असतं. जे आपण सिनेमांमध्ये पाहतो किंवा ज्या कपल्सला आपण फॉलो करतो किंवा ज्याला आपण आदर्श मानतो यापेक्षा ते खूप वेगळं आहे. हे सगळं पाहून लोक स्वत:च्याही आयुष्यात दबाव आणतात. या अगदीच बेसिक गोष्टी आहेत."