"मला दडपण नाही, पण...", CHYDच्या नव्या पर्वाबद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "गेली १० वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:53 IST2025-07-16T14:51:40+5:302025-07-16T14:53:58+5:30
निलेश साबळे ऐवजी 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन हा अभिजीत खांडकेकर करणार आहे. याबाबत पहिल्यांदाच अभिजीतने प्रतिक्रिया दिली आहे.

"मला दडपण नाही, पण...", CHYDच्या नव्या पर्वाबद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "गेली १० वर्ष..."
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कॉमेडी शोचं नव पर्व पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, या पर्वात निलेश साबळे सूत्रसंलान करणार नाही. तर निलेश साबळे ऐवजी 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन हा अभिजीत खांडकेकर करणार आहे. याबाबत पहिल्यांदाच अभिजीतने प्रतिक्रिया दिली आहे. याचं दडपण नसल्याचं अभिजीतने म्हटलं आहे. त्यासोबतच माझ्या पद्धतीने काम करणार असल्याचंही अभिजीतने स्पष्ट केलं आहे.
काय म्हणाला अभिजीत खांडकेकर?
"महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमातून मी आणि माझ्यासारखे अनेक कलाकार या क्षेत्रात आलो आणि आजपर्यंत काम करत आहोत. त्यामुळे झी आणि माझं नातं खास आहे. त्यात 'चला हवा येऊ द्या'सारख्या अत्यंत लोकप्रिय अशा कार्यक्रमासाठी जेव्हा मला विचारलं गेलं, तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. मुळात मला निवेदनाची प्रचंड आवड आहे. मी ही संधी चॅलेंज म्हणून घेतोय. कारण गेली १० वर्ष ज्या पातळीवर हा कार्यक्रम नेऊन ठेवला आहे, त्या टप्प्यावरून तो अजून पुढे नेणं हे खरंच चॅलेंजिंग आहे", असं अभिजीतने म्हटलं आहे.
पुढे तो म्हणाला, "प्रेक्षकांना आधीच्या पर्वा प्रमाणेच या पर्वातून ही तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक अपेक्षा आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मला त्याच दडपण निश्चित नाही. आधीच्या कुठल्याच पर्वाचं बॅगेज माझ्यावर नसल्यामुळे मी माझ्या पद्धतीने नवी सुरुवात करणार आहे. मी या सीझनसाठी प्रचंड उत्साही आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत, आणि त्यांना ही संधी मिळत आहे याचा मला विशेष आनंद आहे. जिथे जिथे ऑडिशन झाली तिथून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या सगळ्या मंडळींना 'चला हवा येऊ द्या' मंचाचा स्पर्श होणार आहे आणि या निमित्तानं काही नवीन हास्य कलाकार महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्या कलाकारांच्या करिअरला एक दिशा मिळणार आहे".
टीमबद्दलही अभिजीतने सांगितलं. तो म्हणाला, "टीम बद्दल सांगायचं झाले तर संपूर्ण टीमसोबतचं माझं बॉण्डिंग फारच छान आहे. कारण आधीपासून त्यांना कायम भेटत आलोय. श्रेया, कुशल, गौरव, प्रियदर्शन आणि भरत दादा या सर्वांसोबत छान संवाद होतो आणि आतापर्यंत मी एक प्रेक्षक म्हणून हे सगळं अनुभवत होतो, पण एक निवेदक म्हणून त्या टीमचा भाग म्हणून आणखीन मज्जा येईल. मला हेच म्हणायचं आहे की, प्रेक्षक हे आमचे मायबाप आहेत, त्यांच्याकडून इतकीच अपेक्षा आहे की, जितकं प्रेम या आधीच्या पर्वांना दिलं, तितकंच भरभरून प्रेम या पर्वालाही द्यावं. यंदा या पर्वातून महाराष्ट्राला अनेक नवीन हास्यकलाकार मिळणार आहेत. यावेळीच 'चला हवा येऊ द्या' नव्या प्रकारे सादर होणार आहे, आणि हे नवीन बदल प्रेक्षकांना नक्की आवडतील याची काळजी घेतली आहे. माझं हेच म्हणणं आहे की १० वर्ष प्रेम देऊन या कार्यक्रमाला इतक्या मोठया शिखरावर नेऊन ठेवलं तेच प्रेम आणि आशीर्वाद प्रेक्षकांकडून या पर्वासाठी अपेक्षित आहे".