VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 09:37 IST2026-02-01T09:35:33+5:302026-02-01T09:37:48+5:30
"महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी घटना...",'बिग बॉस'च्या मंचावर अजित पवारांबद्दल बोलताना रितेश झाला भावुक, व्हिडीओ पाहून चाहते हळहळले

VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..."
Riteish Deshmukh Video: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपाघतात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले असताना लँडिंगवेळी अजितदादांचे विमान कोसळून पेटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 66 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तसंच मनोरंजनविश्वातील कलाकार देखील शोकमग्न झाले आहेत. अनेकजण सोशल मीडियावर अजित दादांच्या आठवणीत पोस्ट शेअर करत व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुखचा एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. बिग बॉस मराठीच्या नव्या एपिसोडचं शूट करण्यापूर्वी रितेशने अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
या व्हिडीओमध्ये रितेश देशमख सुद्धा भावुक झाल्याचा पाहायला मिळतोय. दरम्यान, रितेश बिग बॉसच्या मंचावर अजित पवारांबद्दल बोलताना म्हणतो,"नमस्कार, २८ जानेवारीचा सूर्य सकाळ घेऊन येण्याऐवजी काळरात्र घेऊन आला. त्या बातमीने जो धक्का दिला, त्यातून मीच काय अख्खा महाराष्ट्र देखील सावरला नाही. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार याचं अपघाती निधन झालं. ही घटना माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी आहे. कारण, ते फक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नव्हते तर आपले लाडके दादा होते. आपण सगळे त्यांना प्रेमाने आदराने अजित दादा म्हणायचो. पण, खरंतर हा बाप माणूस होता. "
त्यानंतर पुढे रितेश म्हणतो, "आज हा कार्यक्रम सुरु करण्याआधी मला दादांना काही सांगायचं आहे. प्रिय दादा... आज इथे उभं राहून तुमच्याबद्दल बोलावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.खरंतर तुमच्या शैलीने,नजरेच्या धाकाने समोरच्याला नि:शब्द करण्याची ताकद तुमच्यात होती.तुमच्या शब्दात होती पण, तुमच्या जाण्याने आज महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. दादा तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिस्त, माया आणि सामाजिक जाण यांचं त्रिवेणी संगम आहे. तुमचं रागावणं सुद्धा समोरच्याला कौतुकाची थाप वाटायची. अनेक वर्षे रखडलेली कामे तुमच्या एका आदेशावर मार्गी लागायची. म्हणूनच तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्यातील कामाचा माणूस होतात. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं तुम्ही सोनं केलंत. तुमचा दिलखुलास अंदाज, मिश्किल स्वभाव... प्रत्येकाला आठलत राहिल. आपल्याच कार्यकर्त्याला 'लव्ह यू' म्हणताना.... "अरे, मला काय लव्ह यू म्हणतोस, बायकोला म्हण. म्हणजे पहिले कुटुंबाकडे बघ, मग गावाकडे लक्ष दे". हे सांगणारा माणूस आता राहिला नाही. दादा... तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही हे खरंय. कारण, तुमच्यासारखी राजकारणाची जाण आणि माणुसकीचं भान असलेला नेता आता शोधून सापडणार नाही. खरंतर महाराष्ट्राचं दुर्दैव असं आपल्यासारखी महाराष्ट्रासाठी झटणारी अनेक बापमाणसं वेळेआधीच सगळ्यांना पोरकं करुन गेली. माननीय विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर.आर पाटील साहेब,प्रमोद महजन आणि आता तुम्ही... तुम्ही सगळ्यांनीच एकच धर्म पाळला.तो म्हणजे महाराष्ट्र धर्म... म्हणूनच आज महाराष्ट्रातील प्रत्येकाचे डोळे पाणावलेत. दादा तुम्ही कालही प्रेरणा होता, आजही प्रेरणा आहात आणि उद्याही असाल. आणि हीच प्रेरणा घेऊन मी कामाला लागतो.", असं म्हणत रितेशने अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. रितेश देशमुखचा हा व्हिडीओ पाहून चाहते देखील हळहळले आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सु्नेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काल ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.