तन्वीसोबतची मैत्री का नाकारलीस? घराबाहेर आल्यानंतर आयुष संजीव म्हणाला, "मी तिला स्पष्ट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:37 IST2026-02-17T11:37:27+5:302026-02-17T11:37:54+5:30
BBM 6: आयुष संजीव तन्वीसोबतच्या बाँडबद्दल काय म्हणाला?

तन्वीसोबतची मैत्री का नाकारलीस? घराबाहेर आल्यानंतर आयुष संजीव म्हणाला, "मी तिला स्पष्ट..."
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर पडले. आयुष संजीव आणि करण सोनावणे हे स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखले जायचे. मात्र दोघांचाही प्रवास इथेच संपला. आयुष संजीव आणि तन्वी कोलते यांची शोमध्ये खूप चर्चा झाली होती. तन्वीच्या मनात आयुषबद्दल प्रेम होतं असं सर्वांनाच जाणवलं होतं. मात्र आयुषने कधीच ते स्वीकारलं नाही. आता घराबाहेर आल्यानंतर आयुषने तन्वीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत आयुष संजीव म्हणाला, "तिचे आधीचे मित्र चांगले निघाले नाहीत. मग मी तिच्या आयुष्यात आलो. आमची मैत्री झाली. पण मी फक्त तिचाच मित्र नव्हतो. माझे इतरही मित्र होते. तिला मात्र मीच होतो. त्यामुळे आमची एनर्जी जुळत नव्हती. माझ्यामुळे कोणी दुखावलेलं मला आवडत नाही. म्हणून मी तिची माफीही मागितली. तू माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवतेस त्या मी पूर्ण करु शकत नाही हे मी तिला स्पष्ट सांगितलं. नंतर ती सुद्धा एक पाऊल मागे गेली आणि मीही गेलो. त्याआधी ती कुठेच खोटी वाटली नाही ती नेहमी खरी होती. तिला माझ्याकडून तो मित्र हवा होता जी मैत्री मला देणं शक्य नव्हतं."
आयुष घराबाहेर आल्यानंतर तन्वीने 'तो जायलाच हवा होता' अशी प्रतिक्रिया दिली. या तिच्या दुटप्पीपणावर आयुष म्हणाला, "तन्वीचा दुटप्पीपणा मला घरात असताना इतका जाणवला नाही. तसंही मी असा माणूस आहे ना की मी प्रत्येक गोष्टीत चांगलं काहीतरी शोधतो. मला निगेटिव्ह स्पेसमध्ये राहता येत नाही. कदाचित तिला असं वाटत असेल की याची तब्येत बरी नाहीये. बाहेर गेल्यावर हा बरा होईल म्हणूनही ती असं म्हणाली असेल. ते कारणही असू शकतं. त्यामुळे आपण का टोकाचा विचार करायचा?"