गौरव खन्नासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पत्नी आकांक्षाने सोडलं मौन, म्हणाली- "आमच्या नात्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:17 IST2026-01-30T16:17:21+5:302026-01-30T16:17:48+5:30
आकांक्षाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे गौरव आणि आकांक्षाचा ९ वर्षांचा संसार मोडणार की काय, याबाबत चाहतेही संभ्रमात होते. आता यावर गौरवची पत्नी आकांक्षाने स्पष्टीकरण दिलं आहे.

गौरव खन्नासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर पत्नी आकांक्षाने सोडलं मौन, म्हणाली- "आमच्या नात्यात..."
'बिग बॉस १९' फेम गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. टीव्ही इंडस्ट्रीतील हे सेलिब्रिटी कपल घटस्फोट घेत वेगळं होणार असल्याचं बोललं जात होतं. आकांक्षाने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे गौरव आणि आकांक्षाचा ९ वर्षांचा संसार मोडणार की काय, याबाबत चाहतेही संभ्रमात होते. आता यावर गौरवची पत्नी आकांक्षाने स्पष्टीकरण दिलं आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षाने पोस्ट आणि त्यांच्या नात्याचा कोणताच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. "आमच्या नात्यात कोणताच दुरावा आलेला नाही. त्या पोस्टचा आणि गौरवचा काहीही संबंध नाही. सोशल मीडियावर मी माझ्या पर्सनल गोष्टींबाबत चर्चा करत नाही. ती पोस्ट माझ्या एका वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी होती. प्रत्येकाने आपापल्या परिने त्या पोस्टचा अर्थ घ्यायचा होता. मात्र लोकांनी उगाचच नको त्या गोष्टी पसरवल्या", असं आकांक्षा म्हणाली.
आकांक्षाने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
"ज्या नात्याचा पाया केवळ गरजेवर आधारलेला असतो, तिथे मन नेहमीच बलिदान देतं." इतकेच नाही तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने अधिक गंभीर विधान करत लिहिले, "जेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही तयार आहोत, तेव्हा आम्ही तयार नव्हतो", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
गौरव आणि आकांक्षा यांचे लग्न २४ नोव्हेंबर २०१६ रोजी कानपूरमध्ये झाले होते. गौरवने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याला आकांक्षाशी पहिल्या नजरेतच प्रेम झाले होते. 'बिग बॉस १९' जिंकल्यानंतरही या दोघांनी सोशल मीडियावर अनेक आनंदाचे क्षण शेअर केले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या अशा पोस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.