"मासिक पाळी असतानाही मी..."; 'पुष्पा' गर्लचं विधान चर्चेत! नेटकऱ्यांची नाराजी, म्हणतात- "डॉक्टर असूनही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:44 IST2026-04-10T12:39:15+5:302026-04-10T12:44:29+5:30
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या तिच्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान तिने मासिक पाळीबाबत केलेले भाष्य आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

"मासिक पाळी असतानाही मी..."; 'पुष्पा' गर्लचं विधान चर्चेत! नेटकऱ्यांची नाराजी, म्हणतात- "डॉक्टर असूनही..."
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला सध्या तिच्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'उस्ताद भगत सिंग' या चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान तिने मासिक पाळीबाबत केलेले भाष्य आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं काय म्हणाली श्रीलीला?
एका मुलाखतीदरम्यान आपल्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना श्रीलीला म्हणाली, "माझ्या अनेक गाण्यांचं खूप कौतुक झाले आहे. मी माझ्या मासिक पाळी दरम्यानही अनेक गाण्यांचे शूटिंग केले आहे, त्यामुळे हे कारण देऊन कामातून ब्रेक घेता येत नाही. जेव्हा स्त्री म्हणून आपण समानतेच्या गोष्टी करतो आणि अधिकार मागतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण आपल्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. त्यामुळे शारीरिक किंवा मानसिक अशा कोणत्याही गोष्टींचे कारण सांगता कामा नये."
नेटकऱ्यांचा संताप आणि टीका
श्रीलीलाचे हे विधान समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. अनेकांनी तिच्या लक्षात आणून दिलं की, मासिक पाळीचा अनुभव प्रत्येक महिलेसाठी वेगळा असतो. काहींना किरकोळ त्रास होतो, तर अनेकींना इतक्या तीव्र वेदना होतात की त्यांना दैनंदिन कामे करणेही कठीण जाते. विशेषतः 'पीसीओएस' (PCOS) सारख्या समस्या असलेल्या महिलांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक असतो, असेही युजर्सनी नमूद केले आहे.
श्रीलीला ही स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलेलं असतानाही तिने महिलांच्या आरोग्याबाबत असं विधान केल्यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. महिलांच्या आरोग्यातील गुंतागुंत आणि पाळीत होणारा त्रास याकडे दुर्लक्ष करून अभिनेत्रीमध्ये संवेदनशीलता नसल्याचा आरोप तिच्यावर होत आहे.
श्रीलीलाच्या आगामी प्रकल्प कामाबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलीला लवकरच अनुराग बसू यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून यात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. याशिवाय, ती धनुषच्या 'D55' या तमिळ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे, ज्याचे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी करत असून यात मम्मूट्टी आणि साई पल्लवी देखील दिसणार आहेत.