"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:44 IST2025-08-20T13:19:25+5:302025-08-20T13:44:51+5:30

आज हीच 'नकोशी' असलेली भारती मुलगी तिच्या आईसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिने केवळ स्वतःचेच नाही तर कुटुंबाचेही आयुष्य बदलून टाकलं.

अभिनेत्री भारती सिंग ( Bharti Singh) ही भारतातील एक लोकप्रिय आणि यशस्वी कॉमेडियन आहे. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत.

या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तिने कठोर संघर्ष केला आहे. गेल्या महिन्यात ३ जुलै रोजी भारती सिंहने तिचा वाढदिवस साजरा केला. पण, तिच्या जन्माची कथा (Bharti Singh Birth Story) अनेकांना धक्का देणारी आहे.

तुम्हाला माहीत आहे का, भारती तिच्या आई-वडिलांना नकोशी होती? होय, तिच्या आई-वडिलांना तिसरे मूल नको असल्यामुळे तिच्या आईने तिला गर्भातच मारण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते. अनेक प्रयत्न करूनही गर्भपात होऊ शकला नाही आणि भारतीचा जन्म झाला.

भारती सिंगनं नुकतंच राज शमानीच्या पॉडकास्टवर (Bharti Singh In Raj Shamani Podcast) बोलताना अत्यंत भावनिक आणि धक्कादायक खुलासा केला.

भारती म्हणाली की, "माझी आई तिसऱ्यांदा गर्भवती होती, पण त्यांना दुसरे मूल नको होते. सुरुवातीला तिला याची कल्पनाही नव्हती. जेव्हा तिला कळले की ती गर्भवती आहे, तेव्हा तिने गर्भपात करण्यासाठी अनेक औषधी वनस्पती, पपई आणि इतर गरम पदार्थ खाल्ले. एवढेच नाही तर ती सतत जमिनीवर बसून पायांवर जोर देऊन फरशी पुसायची. जेणेकरून गर्भपात होईल. पण मला या जगात यायचे होते आणि मी आलेच".

भारतीने पुढे सांगितले की, "माझ्या आईने मला घरीच एकटीने जन्म दिला, कारण माझे वडील रात्रीच्या शिफ्टमध्ये कामावर होते. माझ्या आईने नाळ कापण्यासाठी फक्त ६० रुपये सुईणीला दिले. मी फक्त ६० रुपयांत जन्माला आलेले बाळ आहे" असे सांगताना भारती भावूक झाली.

पुढे ती म्हणाली, "आज मी माझ्या आईला १ कोटी ६० लाखांचे घर घेऊन दिले आहे. मी अशी मुलगी आहे जी माझ्या आई-वडिलांना नको होती. पण आज मी त्यांच्यासाठी खूप काही करू शकले".

भारतीनं तिच्या यशाचे श्रेय तिच्या आईला दिलं. भारतीच्या वडिलांचे निधन ती अवघ्या २ वर्षांची असताना झालं होतं. तेव्हा तिची आई फक्त २२ वर्षांची होती. दुसऱ्यांदा लग्न करण्याची संधी असतानाही तिच्या आईने मुलांना एकटीने सांभाळले. भारतीला तिच्या आईला गमावण्याची सर्वाधिक भीती वाटते, असेही तिने सांगितले.

आज हीच 'नकोशी' असलेली भारती मुलगी तिच्या आईसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिने केवळ स्वतःचेच नाही तर कुटुंबाचेही आयुष्य बदलून टाकलं.