Archana Gautam : "मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा, हॉटेलमध्ये..."; अर्चना गौतमचा EX बॉयफ्रेंडवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:11 IST2026-03-02T12:36:11+5:302026-03-02T13:11:47+5:30
Archana Gautam : आपल्या लव्ह लाईफमध्ये आपण अत्यंत कठीण काळ सोसला असून एक्स-बॉयफ्रेंडकडून खूप त्रास सहन करावा लागला, त्याने बेदम मारहाण केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना गौतम हिने आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच 'द ५०' या शोमध्ये अर्चनाने आपल्या आयुष्यातील अशा काही गोष्टी सांगितल्या, जे ऐकून तिच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

आपल्या लव्ह लाईफमध्ये आपण अत्यंत कठीण काळ सोसला असून एक्स-बॉयफ्रेंडकडून खूप त्रास सहन करावा लागला, त्याने बेदम मारहाण केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

युविका चौधरीशी संवाद साधताना अर्चना भावूक झाली. तिने तिच्या आधीच्या रिलेशनशिपचा अनुभव अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं. "मी बाहेरून कितीही बोल्ड दिसत असले, तरी प्रेमाच्या बाबतीत मी खूप कमकुवत होते."

"माझा एक्स-बॉयफ्रेंड मला अत्यंत क्रूरपणे मारहाण करायचा" असं सांगितलं. अर्चनाचं हे बोलणं ऐकून युविकाने तिला म्हटलं की, "हे प्रेम नाही. जर कोणी तुला चपला-बुटांनी मारत असेल, तर त्याला प्रेम म्हणता येत नाही."

अर्चनाने पुढे सांगितलं की, "तो दिसायला फारसा देखणा नव्हता. मी त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदललं होतं, त्याला हिरो बनवलं होतं. २४ तास माझं लक्ष फक्त त्याच्यावरच असायचं."

"मी त्याच्यासाठी १०० पेक्षा जास्त कपडे खरेदी केले होते आणि त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायचे. इतकं सगळं करूनही बदल्यात काय मिळालं?"

"इतकं करूनही त्याने माझा फक्त शारीरिक छळ केला. तो मला किती निर्दयीपणे मारायचा हे मी सांगू देखील शकत नाही. मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारायचा."

"एकदा हॉटेलमध्ये जेव्हा मी मदतीसाठी ओरडण्याची धमकी दिली, तेव्हा त्याने मला अधिकच मारलं. एकदा तर त्याने दुसऱ्या मुलीसमोर मला इतकी वाईट मारहाण केली की, ती मुलगीही घाबरून तिथून पळून गेली."

या धक्कादायक अनुभवामुळे अर्चना डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने सांगितलं की, "त्या काळात माझे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं होतं. मी नुकतीच त्या कठीण काळातून बाहेर पडले आहे."

अर्चनाची ही व्यथा ऐकून युविकाने तिला समजावलं की, दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये राहणं म्हणजे प्रेम नाही, स्वतःवर प्रेम करणं सर्वात महत्त्वाचं आहे. अर्चनाची ही गोष्ट ऐकून तिचे चाहतेही भावूक झाले आहेत.

















