"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:25 IST2026-04-12T16:13:00+5:302026-04-12T16:25:40+5:30

आशाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांची एक जुनी मुलाखत आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली 'शेवटची इच्छा' प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान पर्व आज संपले आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.

आशाताईंच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांची एक जुनी मुलाखत आणि त्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली 'शेवटची इच्छा' प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती RJ अनमोल यांना दिलेल्या मुलाखतीत आशा भोसले म्हणाल्या होत्या की, ''माझी अशी इच्छा आहे की गाणं गाता गाता मी जगाचा निरोप घ्यावा.आता मला काही शिकायची गरज नाही. लहानपणापासून मी गातेय. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून क्लासिकल गातेय. बाबांनीही शिकवलंय. संपूर्ण आयुष्य यातच गेलं.''

''फिल्म इंडस्ट्रीतही मला ८२ वर्ष झाली आहेत. त्यामुळे गाणं गाता गाताच मी अखेरचा श्वास घ्यावा. मी जर गाता गाता जगाचा निरोप घेतला तर मला खूप आनंद होईल'', अशाप्रकारे आशा भोसलेंनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती.

आशा भोसले यांची संगीताप्रती असलेली ही अपार निष्ठा आणि प्रेम या विधानातून स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ गायनाच्या सेवेसाठी अर्पण केले होते.

आशा भोसले यांनी केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, बंगाली, गुजराती आणि अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे

अनेक दिग्गज कलाकार आणि राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, "एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे," अशा भावना व्यक्त केल्या आहेत.