मिलिंद गुणाजींनी सांगितला 'देवदास'चा किस्सा, त्यांच्यासाठी शाहरुखची शूट थांबवण्याची होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:16 PM2024-02-05T20:16:19+5:302024-02-05T20:26:47+5:30

Milind Gunaji recalls Devdas: शाहरुख खानने तेव्हा मला खूप धीर दिला...मिलिंद गुणाजींनी सांगितली भावूक आठवण

संजय लीला भन्साळी यांचा 2002 सालचा मास्टरपीस 'देवदास' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर आहे. सिनेमाची गाणी, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, भव्य सेट हे सगळं मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक अक्षरश: भारावले होते. याच सिनेमात कालीबाबू या निगेटिव्ह भूमिकेत दिसले होते मराठी अभिनेते मिलिंद गुणाजी (Milind Gunaji).

'भटकंती' फेम अभिनेते मिलिंद गुणाजी सध्या चर्चेत आहे. त्यांनी नुकतीच एका न्यूज साईटला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुपरहिट 'देवदास'च्या आठवणी जाग्या केल्या. तसंच कठीण प्रसंगी शाहरुख खान, संजय लीला भन्साळी यांनी कसा आधार दिला हेही सांगितले.

संजय लीला भन्साळी यांचा 'देवदास' सिनेमा तेव्हाचा मास्टरपीस होता. या सिनेमासाठी मोठा खर्च करण्यात आला होता. भव्य सेट उभा केल्यानंतर वेळेत शूट पूर्ण होणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे एखाद्या दिवसाचा जरी खंड पडला तरी मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

'देवदास'चं शूट सुरु असताना एकवेळ अशी आली होती की मिलिंद गुणाजींसाठी शूट थांबवावं लागणार होतं. शाहरुख खान आणि भन्साळी यांनी कशाचीही पर्वा न करता तेव्हा त्यांना धीर दिला होता. तो किस्सा त्यांनी नुकताच शेअर केला आहे.

मिलिंद म्हणाले, "शूट सुरु होण्याच्या काही दिवस आधीच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझ्यासाठी तो काळ खूप कठीण होता. पण मला आठवतंय त्यावेळी शाहरुखच होता ज्याने मला सेटवर धीर दिला. तो खूपच चांगला आणि सज्जन माणूस आहे."

ते पुढे म्हणाले, "शूटिंगवेळी सेटवर तो माझ्यासोबत येऊन बसायचा. जर शूट थांबवायची गरज असेल तर आपण थांबवू कोणालाच काही अडचण होणार नाही असाही त्याने मला विश्वास दिला. अगदी संजय भन्साळी सुद्धा यावर माझ्याशी बोलले होते."

'डोला रे डोला' गाण्याचा किस्सा शेअर करताना ते म्हणाले, "ते गाणं हँडहेल्ड कॅमेऱ्यावर शूट झालं होतं. ऐश्वर्या आणि माधुरी अप्रतिम नृत्य करत होत्या. मात्र काही तांत्रिक समस्या येत होती. त्यामुळे जरा अस्वस्थेचं वातावरण होतं.माधुरीच्या पायालाही लागलं होतं. पण संजय भन्साळी यांनी त्यांचा परफेक्ट शॉट घेतलाच."

मिलिंद गुणाजी सध्या मोजकंच काम करतात. त्यांनी ओटीटी माध्यमातही पदार्पण केले आहे. त्यांना फोटोग्राफीची आणि फिरण्याचीही आवड आहे. त्यांचा 'भटकंती' हा शो खूपच लोकप्रिय झाला होता.