Mandana Karimi : "मी भारत सोडतेय, मॉडेलिंग करिअर... "; खामेनेईंच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मायदेशी परतण्यास सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 08:41 IST2026-03-04T08:30:57+5:302026-03-04T08:41:40+5:30
Mandana Karimi : मंदानाला मायदेशी म्हणजेच इराणला परत जाण्याची ओढ लागली आहे.

इराणी अभिनेत्री मंदाना करीमी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. तिने येथेच आपलं करिअर घडवलं. आधी मॉडेलिंग आणि नंतर चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र आता मंदानाला तिच्या मायदेशी म्हणजेच इराणला परत जाण्याची ओढ लागली आहे.

'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना मंदानाने सांगितलं की, जानेवारीपासून तिला काम मिळणं बंद झाले आहे आणि तिचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स कॅन्सल करण्यात आले आहेत. याचं कारण म्हणजे ती राजकीयदृष्ट्या एक्टिव्ह झाली असून सोशल मीडियावर उघडपणे आपली मतं मांडत आहे.

जेव्हा मंदानाला विचारण्यात आलं की, ती पुन्हा कधी इराणला जाणार का? तेव्हा ती म्हणाली, "हो, जशी ही राजवट संपेल, तशी मी निघून जाईन. खरं तर मी आताच निघण्याची तयारी करत आहे.

"माझं सामान आधीच पॅक झालं आहे. मी भारत सोडत आहे." अभिनेत्री भावूक होत पुढे म्हणाली, "मला असं वाटतंय की, मी भारताशी असलेलं माझं नातं तोडत आहे."

"हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, कारण मी वय कमी असताना भारतात आले होते. या देशाने मला सर्व काही दिलं – माझं मॉडेलिंग करिअर, अभिनय क्षेत्रात ओळख आणि खूप प्रेम व मित्र."

"परंतु, मला असं वाटतं की भारतात आता माझं काही उरलेलं नाही. गेल्या दोन महिन्यांत मला घरची खूप आठवण येत आहे. याआधी मला इतकं एकटं कधीच वाटलं नव्हतं" असंही मंदानाने म्हटलं.

ती आतापर्यंत इराणला का परतली नाही, या प्रश्नावर तिने सांगितलं की, तिथल्या क्रूरतेमुळे एक मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून तिथे राहणं तिच्यासाठी अशक्य झालं होतं.

इराणबद्दल उघडपणे बोलल्यामुळे तिला पर्सनल आयुष्यात मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यावर जाहीरपणे भाष्य केल्यापासून भारतातील अनेक लोकांशी तिची मैत्री कमी झाल्याचंही तिने सांगितलं.

आपल्या स्वप्नातील इराणबद्दल बोलताना मंदाना म्हणाली की, तिला अशा इराणची अपेक्षा आहे जिथे महिला मुक्तपणे जगू शकतील, काय परिधान करायचं आणि कसं जगायचं याचा निर्णय त्या भीतीशिवाय घेऊ शकतील.

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूवर मंदानाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मृत्यूवर शोक व्यक्त करणाऱ्यांवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून, त्यांच्या राजवटीला "हुकूमशाही" म्हटलं आहे. सरकारकडून अनेक निष्पाप लोकांची हत्या करण्यात आल्याचा दावाही तिने यावेळी केला.

















