'बिग बी' ते जावेद अख्तरांपर्यंत, 'या' पाच सेलेब्सच्या घरी होळी साजरी केली जात नाही, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 12:03 PM2023-03-07T12:03:08+5:302023-03-07T12:16:02+5:30

एक काळ असा होता जेव्हा भारतीय सणांची ओळख हिंदी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत होती. मोठ्या जल्लोषात आणि ग्लॅमरस स्टाइलमध्ये होळीचे चित्रीकरण सिनेमांमध्ये केलं जायचं. इतकंच नाही तर चित्रपट कलाकार त्यांच्या वैयक्तिक पातळीवरही अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये होळीचं सेलिब्रेशन करायचे.

सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्याची प्रथा पृथ्वीराज कपूरपासून अमिताभ बच्चनपर्यंत यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी सुरू केली. होळीचं सेलिब्रेशन म्हटलं की या सेलिब्रेटींच्या सेलिब्रेशनचीच चर्चा व्हायची. सर्वात प्रसिद्ध राज कपूर यांची होळी होती, जिथे सिनेसृष्टीतील दिग्गज आवर्जुन धुळवडीसाठी उपस्थित राहायचे. या सोहळ्यासाठी आमंत्रण मिळणं हीच खरी अभिमानाची बाब मानली जायची.

आता सिनेइंडस्ट्रीमध्ये आधीसारखं होळी सेलिब्रेशन राहिलेलं नाही. बॉलिवूड स्टार्स आता मोठ्या प्रमाणावर होळीचं आयोजन करत नाहीत. आता तर यातील काही सेलिब्रेटींनी आपल्या घरी साजरी केल्या जाणाऱ्या या होळीचं सेलिब्रेशनच बंद केलं आहे.

राज कपूर यांच्या आरके स्टुडिओमध्ये साजरी केली जाणारी होळी आणि धुळवड बॉलीवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध होती. सगळे मोठे स्टार्स हजेरी लावायचे. त्यांना होळी साजरी करण्यासाठी आमंत्रणे पाठवण्यात यायची. एक मोठा टब रंगाच्या पाण्यानं भरला जायचा आणि स्टार्स होळी साजरी करायचे.

सिनेतारका या पार्टीत ढोल-ताशांच्या तालावर नाचायच्या. गाणी गायली जायची. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाणेपिणे सुरू असायचं. मेरा नाम जोकर फ्लॉप झाला, आरके प्रोडक्शन तोट्यात गेले, तेव्हाही इथे होळीचे आयोजन करण्यात आले होते. १९८८ मध्ये राज कपूर यांच्या निधनाने येथील होळी साजरी करणं थांबलं.

बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट आणि अभिनेते देणारे यश चोप्रा देखील होळी पार्टीचं आयोजन करायचे. यशराज स्टुडिओमध्ये ही पार्टी आयोजित केली जायची, ज्यात त्यांचे जवळचे मित्र आणि कर्मचारी मजा लुटायचे. त्यांच्या मृत्यूनंतर हा सोहळा थांबला.

राज कपूरप्रमाणेच सुभाष घई यांनाही शोमन मानले जायचे. अशा परिस्थितीत सुभाष घईही त्यांच्या मढ आयलंड बंगल्यावर होळीचे आयोजन करायचे. यात बडे स्टार्सही हजेरी लावायचे. ते अभिनेत्यांसह फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या तंत्रज्ञांसह इतरही पडद्यामागच्या कलाकारांना बोलवायचे. ८० च्या दशकात सुभाष घई यांची होळी पार्टी चर्चेचा विषय होती. पण काही कारणास्तव ही पार्टी देखील पुढे बंद झाली.

रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे.... अमिताभ यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे होळीच्या प्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहूच्या बंगल्यावर मोठी होळी साजरी करायची तेव्हा हे गाणे खूप वाजायचे. यामध्ये बॉलीवूडचे सर्व मोठे स्टार्सही सहभागी होत असत. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर बच्चन कुटुंबाने सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करणे बंद केले.

अलीकडच्या काळात शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या घरी होळी साजरी केली जात असे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर शबाना आझमी यांनी कार्यक्रम रद्द केला.