'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:22 IST2025-05-01T16:16:38+5:302025-05-01T16:22:19+5:30
मराठी सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

'आता थांबायचं नाय' चित्रपट पाहून मराठी अभिनेता भारावला, म्हणाला-"पोस्ट लिहिणं अवघड जातंय कारण..."
Aashay Kulkarni Post: मराठी सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या प्रेक्षकांमध्ये अशाच एका चित्रपटासबद्दल चर्चा सुरु आहे. हा चित्रपट म्हणजे शिवराज वायचळ दिग्दर्शित 'आता आता थांबायचं नाय'. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१६ मध्ये घडलेल्या घटनेपासून प्रेरित होऊन ही कथा रचलेली आहे. या चित्रपटाचं कथानकाने सिनेरसिकांना प्रचंड आवडलेलं दिसतंय. याच चित्रपटासंदर्भात मराठी अभिनेता आशय कुलकर्णीने (Aashay Kulkarni) शिवराज वायचळ याचं कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता आशय कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यासोबत शिवराज वायचळसोबतचा खास फोटो देखील पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने चित्रपटाबद्दल सांगताना लिहिलंय की, "आज संपूर्ण महाराष्ट्रात १ मे म्हणजेच कामगार दिना निमित्ताने ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.‘दिग्दर्शक- शिवराज वायचळ. तुझं मनापासून अभिनंदन. पोस्ट लिहिणं अवघड जातंय, शब्द तू समोर असताना जसे सहज पटापट बाहेर येतात तसे काही येईना ब्वा ! पण प्रयत्न करतोय …‘आता थांबायचं नाही’ प्रवास अगदी सुरुवाती पासून पाहतोय, माणूस म्हणून तुझ्यातला सच्चेपणा, कलेसाठी तुझं असलेलं प्रेम, जिद्द, चिकाटी आणि तुझे कष्ट याचा अनुभव चित्रपटातल्या हर एक प्रसंगातून येत होता. तू जसा आहेस तशीच उत्तम माणसं तू जोडली आहेस. तुझं कौशल्य तुझ्या शांत स्वभावात दडलेलं आहे. यार...!!"
यानंतर मग आशयने लिहिलंय, "‘आता थांबायचं नाय’ ही एका माणसाची गोष्ट नसून चित्रपटात आणि वास्तवात असलेल्या असामान्य माणसांची गोष्ट आहे. स्वप्न पाहणं आणि ते पुर्ण करण्यासाठीच्या कष्टाची गोष्ट आहे. कुटुंबातील प्रत्येक माणसाचं नुसतं बरोबर असणं आणि त्यांचा आधार असण्याची गोष्ट आहे. एक तरी खमका मित्र आयुष्यात असणं, तो असतोच याची गोष्ट आहे.माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. प्रेरणादायी गोष्ट !‘आता थांबायचं नाय’ फक्त नव्या / पहिल्यांदाच/ नविन दिग्दर्शकाने केलेला चित्रपट नसून तो मराठी चित्रपटातसृष्टीत, चित्रपटसृष्टीसाठी नविन उमेद जागवणारा प्रयत्न सुद्धा आहे. यासाठी @zeestudiosmarathi @bavesh123 @tusharhiranandani @dharamv तुम्हा सर्वांचे कौतुक आणि आभार !खूप खूप अभिमान शिवराज मित्रा !!! आता काय ??? आता थांबायचं नाय !!!"
दरम्यान, 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी म्हणजेच आज १ मेच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.