"देव कुटुंबासाठी हा हृदयद्रावक क्षण...", उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाले- "पार्थ तुला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:58 IST2026-01-28T11:57:37+5:302026-01-28T11:58:14+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. अजित पवारांचे अनेक सेलिब्रिटींशीही चांगले संबंध होते. त्यांच्या निधनानंतर मराठी अभिनेता अजिंक्य देव यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

"देव कुटुंबासाठी हा हृदयद्रावक क्षण...", उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजिंक्य देव भावुक, म्हणाले- "पार्थ तुला..."
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या आज बारामती येथे सभा होणार होत्या त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असताना अपघात होऊन जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अनेक सेलिब्रिटींशीही चांगले संबंध होते. त्यांच्या निधनानंतर मराठी अभिनेता अजिंक्य देव यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
अजित पवार यांच्यासोबतचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी पवार कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. "देव कुटुंबासाठी हा अत्यंत हृदयद्रावक क्षण आहे. अजित दादा आपल्यातून निघून गेले, ही गोष्ट अजूनही अविश्वसनीय आणि मनाला न पटणारी आहे. ते एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, कुशल राजकारणी, प्रशासक आणि आमचे अत्यंत जवळचे कुटुंबीय मित्र होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना तसेच गेल्या काही काळापासून जवळचा मित्र असलेल्या पार्थ पवार यांना माझ्या मनापासून संवेदना. या अपार दुःखातून सावरण्याची ताकद देव त्यांना देवो", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. काका शदर पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. पुढे १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले. तसेच अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सर्वाधिक काळ सांभाळण्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता. तसेच सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.