"अभिनय करताना मरावं असं मला वाटत नाही, कारण...", अतुल कुलकर्णी असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:50 IST2024-12-21T15:48:23+5:302024-12-21T15:50:20+5:30
काही कलाकारांनीही याबाबत तशा इच्छा व्यक्त केल्याचं आपण ऐकलं असेल. पण, अतुल कुलकर्णींना मात्र असं अजिबात वाटत नाही. त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

"अभिनय करताना मरावं असं मला वाटत नाही, कारण...", अतुल कुलकर्णी असं का म्हणाले?
अतुल कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील उमदा नट आहेत. उत्तम अभिनयाने त्यांनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या. मराठीबरोबरच अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आपलं आवडतं काम करताना मरण यावं, असं अनेकांना वाटत असतं. काही कलाकारांनीही याबाबत तशा इच्छा व्यक्त केल्याचं आपण ऐकलं असेल. पण, अतुल कुलकर्णींना मात्र असं अजिबात वाटत नाही. त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
"माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नव्हे. माझ्या व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तो छोटा भाग आहे. अभिनय करता करता मरावं वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. तसं झालंच तर चुकीचं आयुष्य जगलो, असं मला वाटेल. आयुष्यात इतर इतक्या गोष्टी आहेत. त्या करण्यासाठी जर मी स्वत:ला वेळ दिला नाही. ह्या गोष्टी समजून घेतल्या नाहीत. तर मग जसा जन्मलो...किंवा काहीतरी मला प्रोफेशन सापडलं आणि त्याच्यातच हरवून फक्त तेच करत जर मी मरुन गेलो. तर मला वाटत नाही की मी फार यशस्वी माणूस आहे. माझं आयुष्य यशस्वीरित्या जगलो असं मला अजिबात वाटणार नाही", असं अतुल कुलकर्णी अमोल परचुरे यांच्या कॅच अप या शोमध्ये म्हणाले.
दरम्यान, अतुल कुलकर्णी बंदिश बंदिस्त या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमेझॉन प्राइमवर या वेब सीरिजचा दुसरा सीझन अलिकडेच प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमधील त्यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.