"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:02 IST2025-06-27T13:01:25+5:302025-06-27T13:02:50+5:30
राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण या मोर्चात सहभागी होतायेत आणि कोण येणार नाही हेदेखील मला बघायचं आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं होते.

"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
मुंबई - राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी भाषिकांच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ जुलैला हा मोर्चा निघेल. विशेष म्हणजे या मोर्चात पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित दिसणार आहे. ठाकरे बंधूंनी घेतलेल्या हिंदी सक्तीविरोधातील भूमिकेमुळे भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यातच मराठी भाषिकांच्या मोर्चाला सर्वांनीच यावे, कोण येणार नाही हेदेखील मी पाहतो असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र याच मुद्द्यावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात हिंदी भाषा सक्तीचा विषय चर्चेत आला आहे. या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याचे दिसते. याकडे तुम्ही कसे पाहता असा प्रश्न पत्रकारांनी आशा भोसले यांना केला. त्यावर त्या म्हणाल्या की, राजकारणात मला फक्त आशिष शेलार हेच माहिती आहेत. बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. राजकारणाशी माझा काहीही संबंध नाही आणि मला राजकारण नकोच अशी प्रतिक्रिया आशा भोसले यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
हिंदी सक्तीविरोधातील लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावे असं मी महाराष्ट्राला आवाहन करेन. मराठी भाषिकांच्या मोर्चा निघेल, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे. इतर राजकीय पक्षांशी मी चर्चा करेन. कुठच्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे माझे लक्षात ठेवा. हे तुम्हाला मोर्चाच्या दिवशी दिसेल. अनेकजण मराठी विषयावर बोलत असतात, परंतु ऐन मोक्याच्या वेळी येत नाहीत. अशी लोक मला बघायची आहेत. यात अनेक कलावंतही आहेत. सर्वजण विरोध दर्शवतायेत. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण या मोर्चात सहभागी होतायेत आणि कोण येणार नाही हेदेखील मला बघायचं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या दृष्टीने ही महत्त्वाची लढाई आहे असं सांगत राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय सुरू आहे. त्रिभाषा सूत्र या नावाखाली आमच्या मुलांवर हिंदी लादली जातेय. हे ओझे आमच्या मुलांना पेलवणार नाही. फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यातही हे सुरू आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण शालेय शिक्षणात अशाप्रकारे महाराष्ट्रावर जबरदस्ती करता येणार नाही. यातून गुजरातला वगळले आहे. मराठी भाषिक संस्था एकत्र येत काम करत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली ती उद्धव ठाकरे यांनीही मांडली असं सांगत खासदार संजय राऊत यांनी राज-उद्धव एकत्रित ५ जुलैला मोर्चा काढतील अशी घोषणा केली आहे.