स्वतःच्या लेकाची भूमिका तरीही सुनील शेट्टीने 'बॉर्डर २' पाहिला नाही; म्हणाला- "चुकीचं समजू नका, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:52 IST2026-01-29T13:46:09+5:302026-01-29T13:52:13+5:30
'बॉर्डर २' या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या मुलाचा इतका मोठा चित्रपट प्रदर्शित होऊनही सुनील शेट्टीने तो अजूनपर्यंत पाहिलेला नाही.

स्वतःच्या लेकाची भूमिका तरीही सुनील शेट्टीने 'बॉर्डर २' पाहिला नाही; म्हणाला- "चुकीचं समजू नका, पण..."
सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा 'अण्णा' म्हणजेच सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या मुलाचा इतका मोठा चित्रपट प्रदर्शित होऊनही सुनील शेट्टीने तो अजूनपर्यंत पाहिलेला नाही. यामागचे एक भावनिक कारण आता समोर आले आहे.
लेकासाठी सुनील शेट्टीचा नवस?
सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याने अहानच्या या चित्रपटासाठी एक विशेष मन्नत मागितली आहे. तो म्हणाला, "जोपर्यंत हा चित्रपट ५०० कोटी रुपयांची कमाई करत नाही, तोपर्यंत मी 'बॉर्डर २' पाहणार नाही. मला चुकीचं समजू नका. पण जोवर सिनेमा ५०० कोटी कमावत नाही तोवर मी सिनेमातील एकही प्रसंग पाहणार नाही, असं ठरवलं आहे." सुनील शेट्टीचा हा निर्णय आपल्या मुलाच्या सिनेमाबद्दल असलेला आत्मविश्वास दर्शवतो.
'बॉर्डर २' ने अवघ्या ६ दिवसांत भारतात २०० कोटींचा टप्पा पार केला असून जागतिक स्तरावर हा चित्रपट ३०० कोटींच्या उंबरठ्यावर आहे. कमाईच्या बाबतीत ज्या वेगाने हा चित्रपट पुढे जात आहे, ते पाहता लवकरच तो ५०० कोटींचा आकडा पार करेल असा अंदाज आहे. सुनील शेट्टीने सांगितले की, ज्या दिवशी चित्रपट हा टप्पा गाठेल, त्याच दिवशी तो संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये जाऊन अहानचे काम पाहणार आहे.
सुनील शेट्टी स्वतः १९९७ च्या मूळ 'बॉर्डर' चित्रपटाचा भाग होता. त्यात त्याने साकारलेली 'भैरो सिंह'ची भूमिका अजरामर झाली आहे. आता २८ वर्षांनंतर त्याचा मुलगा त्याच सिनेमाच्या पुढील भागात भूमिका साकारत आहे, ही त्याच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्याने म्हटले की, "मुलाला अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये पाहणे हे कोणत्याही वडिलांसाठी स्वप्नवत असते. मी सध्या केवळ लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून आनंदी आहे.''