अक्षय खन्नापेक्षा रणवीरचं काम कैक पटींनी चांगलं; 'धुरंधर' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 14:17 IST2026-02-06T14:16:49+5:302026-02-06T14:17:38+5:30
अक्षय खन्ना चांगला दिसला आहे पण..., अभिनेता स्पष्टच बोलला, आदित्य धरच्या 'अश्वत्थामा'मध्ये करणार होता काम

अक्षय खन्नापेक्षा रणवीरचं काम कैक पटींनी चांगलं; 'धुरंधर' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य
'उरी:द सर्जिकल स्ट्राईक' नंतर दिग्दर्शक आदित्य धरने 'धुरंधर' सिनेमातून तुफान कामगिरी केली. हा सिनेमा २ महिने थिएटरमध्ये गाजत होता. १९ मार्च रोजी सिनेमाचा पुढचा भाग येणार आहे. आदित्य धर हा बॉलिवूडमधला उभरता आणि ताकदीचा दिग्दर्शक आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या 'अश्वत्थामा' सिनेमाचीही घोषणा झाली होती. विकी कौशलच त्यामध्ये मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र अचानक हा सिनेमा बंद पडला. या सिनेमात आणखी एकाची भूमिका होती असा खुलासा स्वत: एका अभिनेत्याने केला आहे.
बॉलिवूडचा अण्णा अशी ओळख असलेला हा अभिनेता आहे सुनील शेट्टी. 'लहरें'ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, "मी आदित्य धरच्या अश्वत्थामा सिनेमात भूमिका करणार होतो. सर्व कलाकारांना साईन करण्यात आलं होतं. सगळं काही झालं होतं. मात्र तो सिनेमा बंद पडला. आता मी 'धुरंधर' बघितला आणि मी विचार केला की यार मीही या सिनेमाचा भाग असतो तर मजा आली असती. सिनेमात अक्षय खन्नाच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. तो सिनेमात मस्त दिसतोय. पण मला आदित्य धर आणि रणवीर सिंह त्याहून कैक पटींनी जास्त चांगले वाटले. अक्षय खन्नाची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली याचं कारण म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. ते त्याला शोभून दिसलं. पण रणवीरकडे असं काहीच नव्हतं तरी तो चमकला. कसा? कारण त्याने स्वत: त्याची भूमिका उभी केली. त्याची बॉडी, त्याचा लूक आणि विशेषत: त्याचे डोळे सगळंच लाजवाब होतं."
तो पुढे आदित्य धरचं कौतुक करताना म्हणाला,"आजकाल लोक विचारतात की कोण ३ तास ४० मिनिटांचा बघणार?मात्र आदित्यने प्रेक्षकांचा धागा बरोबर पकडला. त्याला प्रेक्षकांच्या आवडीबद्दल कल्पना आहे. त्याला माहित होतं की कोरोनानंतर लोकांना बिंज वॉच करायची सवय लागली आहे. लोक ६-७ तास बसून अख्खी वेबसीरिज संपवू शकतात तर साडेतीन तासांचा सिनेमा तर बघूच शकतील. मी तुम्हाला आणखी शानदार अनुभव देईन तसंच झालं. आदित्यने तसा अनुभव प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवर दिला. हे फक्त दिग्दर्शकाचा पक्का विचार आणि विश्वास यामुळेच झालं. आदित्यचे विचार कमालीचे आहेत."