एका गॅरेजमुळे सुरु झालं भाईजानचं फिल्मी करिअर; असा मिळाला सलमानला पहिला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 10:30 IST2026-02-17T10:30:00+5:302026-02-17T10:30:00+5:30
Salman khan: सलमानची इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री कशी झालीये हे माहितीये का?

एका गॅरेजमुळे सुरु झालं भाईजानचं फिल्मी करिअर; असा मिळाला सलमानला पहिला सिनेमा
कलाविश्वात आपलं भक्कम स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सलमान खान (Salman Khan).१९८८ मध्ये करिअरची सुरुवात करणाऱ्या सलमानने आज इंडस्ट्रीमध्ये त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच, आज बॉलिवूडचा भाईजान या नावाने तो ओळखला जातो. सलमानने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, इंडस्ट्रीमध्ये त्याची एन्ट्री कशी झालीये हे माहितीये का?
'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाच्या माध्यमातून सलमानने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमानंतर त्याने अनेक गाजलेले सिनेमा बॉलिवूडला दिले. मात्र, या सिनेमासाठी त्याची निवड होण्याची प्रक्रिया फार रंजक होती. या सिनेमाचं दिग्दर्शन जे. के. बिहारी यांनी केलं होतं. अलिकडेच त्यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सलमानची निवड या सिनेमासाठी कशी केली हे सांगितलं. विशेष म्हणजे जर सलमानच्या कुटुंबियांविषयी आधी कळलं असतं तर कदाचित सलमानला या सिनेमात घेतलंच नसतं, असंही ते यावेळी म्हणाले.
गॅरेजमुळे सलमानला मिळाला पहिला सिनेमा
''मी माझ्या गॅरेजमध्ये बसलो होतो. त्याचवेळी एक मुलगा हातात फाईल घेऊन माझ्या दिशेने चालत येत होता. त्याच्या चालण्याची पद्धत पाहूनच मी ठरवलं होतं की याला सिनेमासाठी साइन करायचं. त्यावेळी सलमान तरुण होता आणि इंडस्ट्रीमध्ये जागा मिळावी यासाठी प्रयत्न करत होता'', असं जे. के. बिहारी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "माझ्या जवळ आल्यानंतर आमच्यात काही गोष्टींची चर्चा झाली. त्यावेळी त्याने त्याच्या वडिलांचं नाव सांगितलं नव्हतं. जर त्याने त्याच्या वडिलांचं नाव आधीच सांगितलं असतं. तर कदाचित मी त्याला माझ्या सिनेमात कास्ट केलंच नसतं. सलमान प्रसिद्ध लेखकाचा मुलगा असूनही त्याने कधीच काम मिळवण्यासाठी वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. त्याला फक्त एक संधी हवी होती.त्यामुळे तो कमी मानधनातही काम करायला तयार झाला."
दरम्यान, त्या काळात सलमान त्याच्या करिअरची सुरुवात करत होता. त्यामुळे त्याने अत्यंत कमी मानधनामध्ये एकाच निर्मात्यासोबत तीन सिनेमा साइन केले होते. विशेष म्हणजे एका गॅरेजमध्ये झालेल्या भेटीनंतर सलमानने सिनेमा साइन केले. आणि, त्याच सिनेमामुळे तो रातोरात सुपरस्टार झाला.