"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:59 IST2026-03-26T12:58:21+5:302026-03-26T12:59:12+5:30
दिग्दर्शक आदित्य धरनं जुन्या आणि नव्या गाण्यांचा अप्रतिम मेळ साधला आहे.

"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाची सर्वत्र बरीच चर्चा झाली. 'धुरंधर' चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता १९ मार्च रोजी 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही भागांची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. त्याचबरोबर चित्रपटातील गाण्यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. दिग्दर्शक आदित्य धरनं जुन्या आणि नव्या गाण्यांचा अप्रतिम मेळ साधला आहे.
'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या Fa9la गाण्यासह 'शरारत', 'गहरा हुआ' हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. आता दुसऱ्या भागातीलही 'आरी आरी', 'रासपुतिन', 'जान से गुज़ारते हैं', 'मैं और तू' आणि 'फिर से' ही गाणी सर्वांच्याच पसंतीस उतरली. यातील 'फिर से' या गाण्याने सर्वांनाच रडवले आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'साठी पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याआधी अरिजित सिंगने गायलेले 'फिर से' गाणे खूप लोकप्रिय झाले आहे. प्रेक्षकांसह हे गाणे ऐकताना स्वतः रणवीर सिंग आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांचेही डोळे पाणावले आहेत.
काल युट्यूबवर २५ मार्च रोजी या चित्रपटातील 'फिर से' हे गाणे प्रदर्शित करण्यात आलं. रणवीरने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "मी रडलो... तुम्ही रडलात का?". रणवीरच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रीती झिंटानेही तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकत "हो" अशी कमेंट केली. अवघ्या २४ तासांत या गाण्याला १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सोशल मीडियावर हे गाणे ट्रेंड होत आहे. शशवत सचदेवनं 'फिर से' हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर गाण्याचे हृदयस्पर्शी बोल इरशाद कामिलनं लिहिले आहेत.
७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार!
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांहून अधिक करत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. एका आठवड्यात १००० कोटी कमावणारा हा सर्वात वेगवान चित्रपटांपैकी एक ठरला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' (९१७ कोटी), श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' (८५७ कोटी), विकी कौशलच्या 'छावा' (८०७ कोटी) आणि ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १' (८५२ कोटी) आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' (९१८.१८ कोटी) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या एकूण कमाईला अवघ्या एका आठवड्यात मागे टाकले आहे. लवकरच हा चित्रपट 'कल्की २८९८ AD' (१०४२ कोटी) आणि शाहरुख खानच्या 'जवान' (११६० कोटी) या चित्रपटांना मागे टाकण्याची शक्यता आहे.