"अमिताभ बच्चनचं यश तुझ्या डोळ्यात खुपतं असेल तर.."; जेव्हा ओशोंनी विनोद खन्नांना दिला 'हा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 08:54 IST2025-08-14T08:53:03+5:302025-08-14T08:54:22+5:30
रजनीश ओशो यांच्या आश्रमात जेव्हा विनोद खन्ना राहत होते त्यावेळचा किस्सा. जेव्हा ओशोंनी विनोद खन्ना यांच्या मनातील भावना अचूक पकडली आणि दिला हा सल्ला

"अमिताभ बच्चनचं यश तुझ्या डोळ्यात खुपतं असेल तर.."; जेव्हा ओशोंनी विनोद खन्नांना दिला 'हा' सल्ला
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना आज आपल्यात नसले तरीही त्यांचे अनेक सिनेमे आजही आवडीने पाहिले जातात. विनोद खन्ना यांच्या आयुष्यातील एक गोष्ट म्हणजे जेव्हा ते करिअरचा त्याग करुन ओशो आश्रमात गेले होते. १९७०-८० च्या दशकात विनोद खन्ना हे आपल्या करिअरच्या उंचीवर होते, पण तरीही ते अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर गेले आणि ओशोंच्या आश्रमात राहू लागले. अमिताभ बच्चन यांचं यश डोळ्यात खुपत असल्याने विनोद यांनी हा मार्ग निवडला होता, असं सांगण्यात येतंय. जाणून घ्या
ओशोंचे भाऊ स्वामी शैलेंद्र सरस्वती यांनी याविषयी खुलासा केला आणि सांगितले की, "विनोद खन्ना हे प्रत्यक्षात आपल्या पत्नी आणि मुलांची आठवण काढून दुःखी नव्हते, तर त्यांना अमिताभ बच्चन यांच्या प्रचंड यशाबद्दल मनात असूया वाटत होती. ते बच्चन यांच्या यशावर जळत होते. त्या काळात अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्ये सुपरस्टार होते आणि जवळपास प्रत्येक मोठ्या चित्रपटात त्यांची निवड होत होती. यामुळे विनोद खन्ना यांना वाटत होते की, आपली जागा आणि संधी अमिताभ यांनी घेतली आहे."
"एकदा त्यांनी ओशोंना सांगितले की, त्यांना घरची खूप आठवण येते. पण ओशोंनी त्यांची खरी वेदना ओळखली आणि सांगितले की, तुला तुझ्या कुटुंबाची नव्हे, तर करिअरमध्ये गमावलेल्या स्थानाची खंत आहे. ओशोंनी त्यांना सुचवले की, जर तुला खरंच अमिताभ बच्चनशी स्पर्धा करायची असेल, तर चित्रपटांपेक्षा राजकारणात उतर. यानंतर खरंच विनोद खन्ना यांनी राजकारणात प्रवेश केला. ते भाजपामध्ये सामील झाले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रीही झाले. दुसरीकडे अमिताभ बच्चन काँग्रेसकडून निवडणूक लढले होते." असा खुलासा स्वामी शैलेंद्र यांनी केला.