प्रियंका चोप्राने देश का सोडला? निर्मात्याने उघड केलं बॉलिवूडचं 'डर्टी पॉलिटिक्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:31 IST2026-01-31T13:31:21+5:302026-01-31T13:31:59+5:30
"प्रियंका चोप्राला देश सोडायला भाग पाडलं" निर्मात्याने शाहरुखसोबतच्या नात्याचाही केला उल्लेख

प्रियंका चोप्राने देश का सोडला? निर्मात्याने उघड केलं बॉलिवूडचं 'डर्टी पॉलिटिक्स'
अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने बॉलिवूड सोडून हॉलिवूडची वाट का धरली? या प्रश्नावर आजही चर्चा होत असते. मात्र, आता प्रसिद्ध निर्माते शैलेंद्र सिंग यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. "आम्ही आमच्या सर्वात हुशार अभिनेत्रीशी इतके वाईट वागलो की तिला देश सोडावा लागला" असे म्हणत त्यांनी थेट करण जोहर आणि इंडस्ट्रीतील घराणेशाहीवर निशाणा साधला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शैलेंद्र सिंग यांनी बॉलिवूडच्या सध्याच्या स्थितीवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, "गेल्या १५ वर्षांपासून करण जोहर म्हणजे बॉलिवूड असं मानलं जातं. पण ते खरंच तसं आहे का? प्रियंका चोप्रा ही इंडस्ट्रीची खरी ब्रँड अॅम्बेसेडर असायला हवी होती. ती एक जबरदस्त अभिनेत्री होती, जी जागतिक स्तरावर बॉलिवूडचा चेहरा बनू शकली असती. पण दुर्दैवाने तिला बाहेर ढकलले गेले".
शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा यांच्या कामाच्या पद्धतीची तुलना करताना शैलेंद्र म्हणाले की, हे दोन्ही कलाकार प्रचंड व्यावसायिक आणि प्रतिभावान आहेत. "शाहरुखला आपल्या कामाची आणि स्टारडमची पूर्ण जाण आहे. प्रियंका आणि शाहरुखची विचारसरणी आणि करिअर हाताळण्याची पद्धत खूप सारखी आहे. हे दोघेही इंडस्ट्रीचे खरे प्रतिनिधी असायला हवे होते", असेही त्यांनी नमूद केले.
'डॉन' नंतर नेमकं काय बिघडलं?
'डॉन' आणि 'डॉन २' मधील शाहरुख-प्रियंकाची केमिस्ट्री पडद्यावर गाजली, पण खऱ्या आयुष्यात त्यांच्यातील जवळीक वादाचा विषय ठरली. याच वादातून प्रियंकाला बॉलिवूडमधून पद्धतशीरपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जाते. वृत्तांनुसार, शाहरुखची पत्नी गौरी खान आणि करण जोहर यांनी प्रियंकावर अघोषित बहिष्कार टाकल्यामुळे तिला नवीन काम मिळणे कठीण झाले होते. याच त्रासाला कंटाळून प्रियंकाने अखेर हॉलिवूडचा रस्ता धरला.
शैलेंद्र सिंग यांनी प्रियंकाच्या प्रतिभेचा बॉलिवूडने पुरेपूर वापर केला नसल्याचा आरोप केला. प्रियंका आज हॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली असली, तरी भारतीय सिनेसृष्टीने एक जागतिक दर्जाचा कलाकार गमावला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.