'धुरंधर' मधील रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता दिग्दर्शकाची पहिली पसंती? 'अशी' झाली अभिनेत्याची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 10:59 IST2025-12-15T10:56:56+5:302025-12-15T10:59:36+5:30
रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करताना दिसतो आहे. त्यामुळे चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक होत आहे.

'धुरंधर' मधील रेहमान डकैतच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता दिग्दर्शकाची पहिली पसंती? 'अशी' झाली अभिनेत्याची निवड
Dhurandhar Movie Casting: सध्या सर्वच सिनेप्रेमींमध्ये धुरंधर ची क्रेझ आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो कमाई अनेक विक्रम रचत आहे.'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटातील कास्टिंग आणि कलाकारांच्या परफॉर्मन्सचं सुद्धा आता सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. अशातच कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी खुलासा केलाय धुरंधरची कास्टिंग फायनल करण्यासाठी आदित्य धर यांना जवळपास वर्षभराचा कालावधी लागला होता.
सध्या 'धुरंधर' चित्रपट आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाचं सगळीकडेच कौतुक होत आहे. यापैकी एक म्हणजे अक्षय खन्ना. अभिनेता अक्षय खन्नाने चित्रपटात साकारलेला रेहमान डकैत भाव खाऊन गेला आहे.त्याच्या कामाचं समीक्षकांसह प्रेक्षक देखील भरभरून कौतुक करत आहेत.मात्र, तुम्हाला माहितीये रेहमान डकैतच्या पात्रासाठी अक्षय खन्ना पहिली पसंत नव्हता. चित्रपटाचे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी अलिकडेच एका संवादादरम्यान चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल सविस्तरपणे सांगितले. चित्रपटाची कास्टिंग फायनल करण्यापूर्वी अनेक कलाकारांचा विचार केला गेला, असं देखील त्यांनी सांगितलं. त्यावेळी ते म्हणाले, "मी नेहमीच प्रेक्षकांना कसं आश्चर्यचकित करता येईल आणि कास्टिंगला आणखी मनोरंजक आणि मजेशीर बनवता येईल याचा विचार करत असतो. या चित्रपटाबाबतीतही माझा हाच विचार होता. प्रेक्षकांना या चित्रपटात काहीतरी वेगळं असावं अशी अपेक्षा होती, म्हणून मला कास्टिंगमध्येही एक असाच ट्विस्ट आणायचा होता. त्यामुळे चित्रपटाची कास्टिंग पाहून प्रत्येकाला हेच वाटलं पाहिजे की,कलाकारांची निवड केवळ अशीच केली गेली नाही, तर या त्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे. असं माझं म्हणणं होतं."
कास्टिंगसाठी तासन्तास चर्चा व्हायची...
धुरंधरच्या कास्टिंगसाठी दिग्दर्शकाला दीड वर्षांचा कालावधी लागला होता, असा खुलासा सुद्धा त्यांनी केला. या कास्टिंग प्रक्रियेविषयी बोलताना ते म्हणाले,"या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी आम्ही कास्टिंगवर खूप वेळ घालवला, आणि प्रत्येक भूमिकेसाठी कोणत्या कलाकाराची कास्टिंग उत्तम ठरेल याचा सतत विचार करत राहिलो. चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी कलाकाराची निवड करण्यापूर्वी खूप चर्चा झाली. संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन हे चित्रपटासाठी योग्य ठरतील की नाही, यावर आम्ही सतत चर्चा करत होतो.मी आणि आदित्य धर दररोज २ ते ४ तास एकत्र बसून, ही गोष्ट यशस्वी होईल की नाही, यावरच चर्चा करायचो.लोकांना सरप्राईज देण्याचा दुसरा काही मार्ग आहे का? या भूमिकांसाठी इतर कोणाची निवड केली जाऊ शकते का? सुरुवातीला, आम्ही या चित्रपटासाठी काही अशा कलाकारांचा विचार केला होता, ज्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलं काम केलं आहे. पण नंतर, चित्रपटाच्या गरजेनुसार, आम्ही कलाकारांची निवड केली."
अशी झाली अक्षय खन्नाची निवड?
यादरम्यान,रेहमान डकैतच्या पात्राच्या कास्टिंगसाठी सर्वाधिक वेळ गेला. तो कास्टिंगचा किस्सा सांगत ते म्हणाले, "या भूमिकेसाठी ५०-६० कलाकारांच्या नावांची चर्चा झाली होती. यापैकी अनेक कलाकार साऊथ इंडस्ट्रीतील होते. पण, 'छावा', 'हमराज', 'बॉर्डर' आणि 'दिल चाहता है' यांसारख्या चित्रपटांमधील अक्षय खन्नाचं काम पाहून अखेरीस त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. जेव्हा तुम्हाला कोणाला कास्ट करायचे आहे हे ठरवण्यासाठी पुरेसा वेळ असेल, तेव्हाच तुम्ही चांगले कास्टिंग निवड करू शकता. कास्टिंग म्हणजे अचानक करता येणारी गोष्ट नाही." असं मतही मुकेश यांनी यावेळी मांडलं.