"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:19 IST2026-02-03T16:18:49+5:302026-02-03T16:19:36+5:30
मृणाल ठाकूर प्रेमावर भरभरुन बोलली

"प्रेम अशी गोष्ट जी सर्वांनी अनुभवली पाहिजे...", मृणाल ठाकूरने सांगितली प्रेमाची व्याख्या
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या डेटिंगसह लग्नाच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र, धनुषच्या निकटवर्तीयांनी या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केलं. धनुषचा सध्या पुन्हा विवाह करण्याचा कोणताही विचार नसून तो केवळ करिअरवर आणि आपल्या मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करत आहे. मृणाल आणि धनुष यांच्यात केवळ मैत्रीचे नाते असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. तर आता नुकतंच मृणालने प्रेमावर भाष्य केलं आहे.
मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'भीगी भीगी' या नव्या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेमाबद्दल आपले विचार मांडले. ती म्हणाली, "प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना असून ती माणसाला अधिक प्रगल्भ बनवते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रेमाचा अनुभव घ्यायला हवा कारण हे नातं आपल्याला स्वतःमधील उणिवा दूर करून एक चांगला माणूस बनण्यासाठी मदत करते. प्रत्येकालाच आयुष्यात प्रेम मिळावं अशी मी प्रार्थना करते."
प्रेमात पडलेल्या महिला जास्त दयाळु होतात का? यावर मृणाल म्हणाली, "असं गरजेचं नाही. मी याच्याशी असहमत आहे. प्रेमात सर्वात गरजेचं आहे ते म्हणजे माणूस जसा आहे तसं त्याला स्वीकारणं. कधी कधी प्रेम मिळवणं आणि ते स्वीकारणंही कठीण होऊन जातं."
प्रेमाच्या बदलत्या व्याख्येवर बोलताना मृणालने सांगितले की, प्रेमात स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे महत्त्वाचे असते. प्रेम ही आयुष्यातील एकमेव स्थिर गोष्ट असून, समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्वीकारणे कधीकधी कठीण असते, मात्र तेच खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही 'देण्याच्या' भावनेत असता आणि त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची तुमची तयारी असते, असेही तिने स्पष्ट केले.