महाराष्ट्रातील पूरावर साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही...! बॉलिवूडकरांवर मनसे संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 14:08 IST2021-07-25T14:04:56+5:302021-07-25T14:08:57+5:30
Maharashtra floods : अमेय खोपकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना थोडं संवेदनशील बना, असं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील पूरावर साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही...! बॉलिवूडकरांवर मनसे संतापली
रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पूराने (Maharashtra floods) थैमान घातले आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू, आप्तांना गमावलेल्यांचा टाहो मन हेलावणारा आहे. पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. शासनासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था, स्थानिक रात्रंदिवस राबत आहेत. पण बॉलिवूड ( Bollywood ) मात्र शांत आहे. नेमक्या याच गोष्टीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतापली आहे. राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंस वाटत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. (MNS Amey Khopkar slams Bollywood celebrities over Maharashtra floods )
अमेय खोपकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना थोडं संवेदनशील बना, असं आवाहन केलं आहे.
अमेय खोपकर यांची पोस्ट...
इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बड्या बॉलिवूड ताºयांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो, असं अमेय खोपकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
भरत जाधवने केलं मदतीचं आवाहन
कोकणात सध्या संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना आज वस्तू आणि अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळेच, मराठमोळा अभिनेता आणि कोकणचा पुत्र भरत जाधव पुढे सरसावला आहे. भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ‘युथ फॉर डेमॉक्रसी’, असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात, जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ (सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर). कुटुंबातील महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरून-पांघरुण देण्यासाठी भरत जाधवने मदतीची हाक दिली आहे.