Lata Mangeshkar : कोणत्या कारणामुळे लता मंगेशकर आयुष्यभर राहिल्या होत्या अविवाहित? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:06 PM2022-02-06T12:06:37+5:302022-02-06T12:07:16+5:30

Lata Mangeshkar: लता मंगेशकर या शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या. त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे.

Lata Mangeshkar: For what reason did Lata Mangeshkar remain unmarried all her life? Find out because ... | Lata Mangeshkar : कोणत्या कारणामुळे लता मंगेशकर आयुष्यभर राहिल्या होत्या अविवाहित? जाणून घ्या कारण...

Lata Mangeshkar : कोणत्या कारणामुळे लता मंगेशकर आयुष्यभर राहिल्या होत्या अविवाहित? जाणून घ्या कारण...

googlenewsNext

गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या वृत्ताने संपूर्ण सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर या शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या. त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्यामागे एक खास कारण आहे. याबाबत फार कमी लोकांना माहित आहे. लता मंगेशकर यांचे डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर प्रचंड प्रेम होते, असे सांगितले जाते. राज सिंह हे लता मंगेशकर यांच्या भावाचे खूप जवळचे मित्र होते.

लता मंगेशकर यांनी त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले होते. आपल्या भाऊ-बहिणींना कधीही पालकांची कमतरता जाणवू दिली नाही. लता मंगेशकर या अतिशय लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. सगळ्या भावंडांमध्ये त्या मोठ्या असल्याने घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांनी अतिशय कमी वयात सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला होता. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला कोरसमध्ये गाणे गायले. तसेच काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला होता.


लता मंगेशकर यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही पण त्यांनी त्यांच्या भावंडांना शिकवले. त्यांनी घरातली सर्व जबाबदारी खूप चांगल्याप्रकारे पेलली. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे त्यांनी कधीही लग्न केले नाही, असे म्हटले जात होते. पण खरं कारण वेगळे होते, असे देखील काही जणांचे म्हणणे होते.

महाराजा राज सिंह यांनी घरच्यांना दिले होते वचन

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह आणि हृदयनाथ मंगेशकर खूप चांगले मित्र होते. ते एकत्र क्रिकेट खेळायचे. जेव्हा राज सिंह शिक्षणासाठी मुंबईत आले, त्यावेळी त्यांची आणि हृदयनाथ यांची ओळख झाली होती. राज सिंह यांचे घरी येणे-जाणेदेखील वाढले. त्यामुळे लता मंगेशकर यांच्यासोबत देखील त्यांची मैत्री झाली होती. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मैत्रीची त्याकाळात मीडियामध्येही खूप चांगलीच चर्चा रंगली होती. या दोघांनाही लग्न करायचं होते, मात्र ही गोष्ट सत्यात उतरू शकली नाही. असे म्हटले जाते की, सर्वसामान्य घराण्यातील मुलीशी लग्न करणार नाही, असे वचन राज यांनी आपल्या आई-वडिलांना दिले होते आणि त्याचमुळे आयुष्याच्या शेवटपर्यंत राज यांनी हे वचन पाळले आणि ते देखील आयुष्यभर सिंगलच राहिले.

अधुरी ही कहानी...

लता मंगेशकर यांच्यापेक्षा राज ६ वर्षांनी मोठे होते. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. क्रिकेटच्या प्रेमामुळे ते कित्येक वर्षे बीसीसीआयशी जोडले गेले होते. लता मंगेशकर यांचे क्रिकेट प्रेम सर्वांच्याच परिचयाचे आहे. राज आणि लता यांना एकत्र आणण्यात क्रिकेटचंही मोठं योगदान असल्याचे बोलले जाते. राज लता मंगेशकर यांना प्रेमाने मिठ्ठू अशी हाक मारायचे. त्यांच्या खिशामध्ये एक टेप रेकॉर्डर नेहमीच असायचा, त्या मध्ये लता मंगेशकर यांच्या निवडक गाण्यांचा समावेश होता. राज सिंह यांचे निधन १२ सप्टेंबर २००९ साली झाले. दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते, मात्र ही कहाणी अपूर्णच राहिली.

Web Title: Lata Mangeshkar: For what reason did Lata Mangeshkar remain unmarried all her life? Find out because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.