'मी कोणालाही कमीपणा दाखवला नाही'; Ajay Devgn सोबत सुरु असलेल्या भाषावादावर Kiccha Sudeep चं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 10:57 IST2022-05-22T10:56:35+5:302022-05-22T10:57:31+5:30
Kiccha sudeep: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदी भाषेवरुन वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

'मी कोणालाही कमीपणा दाखवला नाही'; Ajay Devgn सोबत सुरु असलेल्या भाषावादावर Kiccha Sudeep चं स्पष्टीकरण
Ajay Devgn vs Kiccha Sudeep Hindi National Language Controversy : एकीकडे दाक्षिणात्य चित्रपट उत्तम कथानकांमुळे उंच भरारी घेत आहेत. त्यामुळे पुष्पा, RRR, केजीएफ असे अनेक चित्रपट अल्पावधीत लोकप्रिय झाले. हे चित्रपट केवळ लोकप्रियच झाले नाहीत तर प्रेक्षकांमध्ये साऊथ सिनेमांची एक क्रेझ निर्माण झाली आहे. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn ) या दोघांमध्ये हिंदी भाषेवरुन वाद सुरु झाला आहे. यामध्येच आता किच्चा सुदीपने या वादावर त्याचं मत मांडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदी भाषेवरुन वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादामध्ये अजय देव गणसह राम गोपाल वर्मा, सोनू सूद, सोनू निगम अशा अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली. ‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही,’ असं वक्तव्य किच्चा सुदीपने केलं होतं. त्यावर अजयने संतार व्यक्त केला होता. आता या प्रकरणी एका मुलाखतीत किच्चा सुदीपने त्याचं मत मांडलं आहे.
काय म्हणाला किच्चा सुदीप?
अलिकडेच किच्चा सुदीपने NDTV ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने या वादावर पडदा टाकायचा प्रयत्न केला आहे. "कोणत्याही वादाला पाठिंबा देणं किंवा तो वाद वाढवणं हा माझा उद्देश नव्हता. परंतु, कोणत्याही अजेंड्याशिवाय हे वाद होत गेले. मी माझं मत मांडलं होतं. त्यावर तुम्ही लोकांनी तुमच्या प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्यामध्ये पंतप्रधान यांचं एक वाक्य मला प्रचंड आवडलं आणि ते गौरवास्पद आहे. कोणतीही व्यक्ती जर त्यांच्या भाषेचा सन्मान आणि आत्मविश्वास बाळगत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला पंतप्रधानांचं वक्तव्य नक्कीच आवडेल", असं किच्चा सुदीप म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मी कोणालाही कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. मला माझं मत मांडायचा पूर्णपणे अधिकार आहे."
काय आहे प्रकरण?
दक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेल्या नेत्रदीपक यशाबाबत बोलताना हिंदी आता राष्ट्रभाषा नसल्याचे किच्चा म्हणाला होता. त्याच्यावर अजयने त्याची प्रतिक्रिया दिली होती. ‘हिंदी राष्ट्रभाषा नाही तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीत डब का करता?’, असा खरपूस सवाल अजयने किच्चाला केला. यावरून अजय व किच्चा यांच्यात ‘ट्विटर वॉर’ रंगला होता.