लग्नमंडपात नीतू कपूर झाल्या होत्या बेशुद्ध, करिश्माने सांगितला ऋषी कपूर यांच्या लग्नातील किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:50 IST2026-04-06T09:50:06+5:302026-04-06T09:50:49+5:30
Karisma kapoor: अलिकडेच करिश्माने 'इंडियन आयडॉल 16' मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने काका ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नातील किस्सा सांगितला.

लग्नमंडपात नीतू कपूर झाल्या होत्या बेशुद्ध, करिश्माने सांगितला ऋषी कपूर यांच्या लग्नातील किस्सा
आपल्या अभिनयाने ७०-८० चं दशक गाजवणारं पॉवरफूल कपल म्हणजे दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर. या जोडीने इंडस्ट्रीत बरीच लोकप्रियता मिळवली. त्यामुळे आजही या जोडीचं नाव आदराने घेतलं जातं. ऋषी कपूर यांचं निधन होऊन आता बराच काळ झाला आहे. मात्र, आजही चाहते त्यांची लव्हस्टोरी आणि लग्नातील किस्से मोठ्या आवडीने ऐकतात. यामध्येच त्यांच्या लग्नातील एक किस्सा अभिनेत्री करिश्मा कपूरने सांगितला.
अलिकडेच करिश्माने 'इंडियन आयडॉल 16' मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने काका ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नातील किस्सा सांगितला. ऋषी-नीतू यांच्या लग्नात करिश्मा बरीच लहान होती मात्र, हा किस्सा आजही तिच्या लक्षात आहे.
ऋषी अंकल आणि नीतू आंटी यांच्या लग्नातील एक मजेदार किस्सा सांगितला जातो. ''त्यांच्या लग्नात इतके पाहुणे, स्टार्स आले होते की ही सगळी गर्दी पाहून नीतू आंटी बेशुद्ध पडली होती. तिच्या अशा अचानक बेशुद्ध होण्यामुळे सगळेच जण खूप घाबरले होते.''
''ऋषी अंकल आणि नीतू आंटी यांच्या लग्नातील एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला सांगते जी आजपर्यंत कोणालाच माहित नव्हती. या दोघांच्या लग्नात मी सतत नीतू आंटीच्या बाजूला घुटमळत होते. त्यांच्या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. आणि, घरचं लग्नकार्य असल्यामुळे मी प्रचंड खूश होते आणि हे सगळं एन्जॉय करत होते. मला एकाच वेळी एवढ्या कलाकारांना पाहता आलं याचाच मला जास्त आनंद झाला होता'', असं करिश्मा म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''माझ्या कुटुंबात इतके लेजेंड आहेत की मी त्यांचीच खूप मोठी चाहती आहे. आणि, आमच्या कुटुंबात नीतू आंटीची एक खास जागा आहे. कारण, ती प्रचंड चंचल आहे आणि ती सोबत असतांना एक वेगळीच फिलिंग असते. ती असेल तर एकदम खास वाटतं. ती या वयातही तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. घरातून बाहेर पडतांना तिचा एक छोटा डबा कायम तिच्यासोबत असतो. ती बाहेरची बिर्याणी सुद्धा कधी खात नाही.''
दरम्यान, १९७३ साली बॉबी या चित्रपटातून पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. त्यांनी १९८० साली प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर यांच्याशी विवाह केला होता.