Rishab Shetty : तुम्ही ही चूक करत आहात...; बॉलिवूडबद्दल ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 10:19 IST2022-11-06T10:17:01+5:302022-11-06T10:19:13+5:30
Kantara Star Rishab Shetty : एकीकडे कन्नड सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना बॉलिवूड सिनेमांची अवस्था मात्र वाईट आहे. या वर्षात बॉलिवूडचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे दणकून आपटले. या पार्श्वभूमीवर ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टीने भाष्य केलं आहे.

Rishab Shetty : तुम्ही ही चूक करत आहात...; बॉलिवूडबद्दल ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टी स्पष्टच बोलला...!!
ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty ) ‘कांतारा’ (Kantara) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आपला सिनेमा इतका मोठा ब्लॉकबस्टर होईल, असा विचारही ऋषभ शेट्टीने केला नव्हती. केवळ 16 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं छप्परफाड कमाई केली आहे. कन्नड सिनेमातील हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. हिंदीत डब करण्यात आलेल्या ‘कांतारा’नेही तगडी कमाई केली आहे. ‘कांतारा’चं यश पाहून बॉलिवूडकरही हैराण आहेत. एकीकडे कन्नड सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना बॉलिवूड सिनेमांची अवस्था मात्र वाईट आहे. या वर्षात बॉलिवूडचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे दणकून आपटले.
अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज चौहान’असो किंवा आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अनेक बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला. इतकंच नव्हे तर ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडनेही बॉलिवूडला घाम फोडला. यादरम्यान साऊथ चित्रपटांनी मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली आहे. साऊथ कलाकरांना देशभरातूनच नव्हे तर जगभरातून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता या पार्श्वभूमीवर ‘कांतारा’चा हिरो ऋषभ शेट्टीने भाष्य केलं आहे. बॉलिवूडचं नेमकं काय चुकलं, यावर तो बोलला.
काय म्हणाला ऋषभ शेट्टी
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ शेट्टी बोलला. तो म्हणाला, बॉलिवूड चित्रपटांवर पाश्चात्यांचा मोठा प्रभाव आहे आणि हीच बॉलिवूडकरांची मोठी चूक आहे. तुम्ही तुमच्या कथेत स्वत:च्या प्रादेशिक मुल्यांवर भर द्याल, तितका तुमचा चित्रपट प्रभावी ठरेल. चित्रपट स्वत:साठी नाही तर प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवण्याची गरज आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, स्वत:साठी नाही. आपण प्रेक्षकांना आणि त्यांच्या भावनांना लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांची मूल्ये आणि जीवनपद्धती काय आहे हे पाहिलं पाहिजे. पण आता, हॉलिवूड आणि पाश्चात्य प्रभावामुळे चित्रपट निर्माते भारतातही तेच करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण तुम्ही असा प्रयत्न का करत आहात? लोकांना हॉलिवूड चित्रपटांमधून आधीच प्रभावित केलं आहे. दर्जेदार, कथाकथन आणि कामगिरीच्या हॉलिवूड अधिक चांगलं काम करत आहेत. आता ओटीटीवर वेस्टर्न कंटेंट बºयाच भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण याठिकाणी तुमच्या स्वत:च्या कथा नाही. नेमकं तेच तुम्हाला प्रेक्षकांना देण्याची गरज आहे. आपल्या गावाची कथा जी तुम्हाला जगात कुठेही मिळत नाही, अशा कथा समोर आणा. तुम्ही कथाकार आहात आणि तुमच्या प्रदेशात कथा आहेत. तेच तुम्हाला लोकांसमोर आणण्याची गरज आहे, असं ऋषभ शेट्टी म्हणाला.
‘कांतारा’ची कमाई
16 कोटी बजेटच्या ‘कांतारा’ने 33 दिवसांत वर्ल्डवाईड 309 कोटींची कमाई केली आहे. पौराणिक कथेवर बेतलेला ‘कांतारा’ कन्नड भाषेत गेल्या 30 सप्टेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाचं हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम व्हर्जन 14 ऑक्टोबरला प्रदर्शित झालं. सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने देशात 241.59 कोटींचा गल्ला जमवला आहे. 19 दिवसांत या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 47.55 कोटींचा बिझनेस केला आहे.