जया बच्चन यांच्या 'त्या' अटीमुळे बदलला 'सिलसिला'चा शेवट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:04 IST2026-03-06T11:03:17+5:302026-03-06T11:04:17+5:30
Jaya bachchan: या सिनेमासाठी रेखा, जया आणि अमिताभ या तिघांनाही तयार करणं म्हणजे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी टास्कच होता.

जया बच्चन यांच्या 'त्या' अटीमुळे बदलला 'सिलसिला'चा शेवट?
बॉलिवूडचा आयकॉनिक सिनेमा म्हणजे ‘सिलसिला’(Silsila). अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रेखा (Rekha) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा त्याकाळी तुफान गाजला. इतकंच कशाला आजही तो तितकाच लोकप्रिय आहे. ७० च्या दशकात अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा काहीअंशी त्याच कथेवर आधारित होता. त्यामुळे या सिनेमासाठी जया बच्चन यांना तयार करणं काही सोपं नव्हतं. जया बच्चन यांनी हा सिनेमा साईन करण्यापूर्वी दिग्दर्शकांपुढे एक अट ठेवली होती.
सिलसिला या सिनेमासाठी रेखा, जया आणि अमिताभ या तिघांनाही तयार करणं म्हणजे दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासाठी टास्कच होता. त्यांच्याही मनात थोडी धाकधूक होती. मात्र, त्यांनी या तिघांनाही राजी केलं. विशेष म्हणजे हा सिनेमा सुपरहिट झाला.
सुरुवातीला या चित्रपटात स्मिता पाटील आणि परवीन बाबी यांची निवड करावी असं यश चोप्रा यांना वाटत होतं. मात्र, पडद्यावर या त्रिकुटाला पसंत केलं जाईल की नाही याविषयी ते साशंक होते. त्याचवेळी त्याच्या डोक्यात जया आणि रेखा यांचं नाव आलं. हा विचार त्यांनी बिग बींकडे मांडला आणि त्यांचं मत विचारलं. त्यावर जर त्या दोघींना प्रॉब्लेम नसेल तर मला सुद्धा काही अडचण नाही असं अमिताभ यांनी सांगितलं.
जया बच्चन यांनी ठेवली अट
अमिताभ यांचा होकार मिळाल्यानंतर यश चोप्रा यांनी जया बच्चन यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. त्यावर जया बच्चन यांनी होकार तर दिला. मात्र, त्यापूर्वी एक अट सुद्धा ठेवली. या एका अटीमुळे सिनेमाचा शेवट पूर्णपणे बदललं. जर या सिनेमाचा शेवट हॅपी एंडिंगने होणार असेल तरच मी या सिनेमात काम करेन, असं त्यांनी सांगितलं.