खामेनींच्या मृत्यूनंतर शोकप्रदर्शनांवर इराणी अभिनेत्रीची टीका; भारतातील लोकशाहीचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:09 IST2026-03-05T19:02:22+5:302026-03-05T19:09:22+5:30
"लोकशाहीची किंमत ओळखा!" खामेनींच्या निधनानंतर इराणी अभिनेत्रीचे भारतीयांना खडे बोल

खामेनींच्या मृत्यूनंतर शोकप्रदर्शनांवर इराणी अभिनेत्रीची टीका; भारतातील लोकशाहीचं केलं कौतुक
Iran Israel War : इराण (Iran War), इस्त्रायल (Israel) आणि अमेरिका (America) यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्त्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Iran Supreme Leader Ayatollah Khamenei) यांची हत्या झाली. खामेनी यांच्या मृत्यूनंतर जगभरात खळबळ माजली. भारतातही याचे पडसाद पाहायला मिळाले. भारतातील अनेक भागांत खामेनी यांच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात आला. यावर मुळची इराणची असलेली अभिनेत्री एलनाज नोरोझीनं प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिनं भारतातील लोकशाहीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
एलनाज नोरोझी ही इराणमध्ये जन्माला आली, पण युरोपमध्ये लहानाची मोठी झालेली आहे. तिनं एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं, "हे खूप दु:खद आहे. पण मला वाटतं असं फक्त यासाठी घडत आहे. कारण लोकांकडे पूर्ण माहिती नाही. ते इरामध्ये राहिले नाहीत. खामेनींनी धर्माच्या नावाखाली किती अत्याचार केले, किती लोकांना मारलं हे त्यांना माहिती नाही. लोकांना एवढंच माहित आहे की ते धार्मिक नेते होते".
एलनाजनं इराणमधील काही कायद्यांवरही टीका केली. तिनं सांगितलं की, "इराणमध्ये बालविवाहाला परवानगी आहे आणि महिलांना अनेक मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. महिलांना पतीच्या परवानगीशिवाय प्रवास करता येत नाही. घटस्फोट मिळवणंही कठीण आहे. न्यायालयात पुरुषाच्या साक्षेला महिलांपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. वारसाहक्कातही मुलांना मुलींपेक्षा जास्त हिस्सा मिळतो".
भारत सरकारबद्दल बोलताना एलनाज म्हणाल्या की, भारतात राहून सुरक्षित वाटतं. इथलं सरकार सर्वप्रथम आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतं, आणि तेच योग्य आहे. पण इराणमध्ये सरकारसाठी नागरिक ही पहिली प्राधान्यक्रम नाही" असं तिनं नमूद केलं.
महसा अमिनी आंदोलनाचा उल्लेख करत तिनं सांगितले की, तिच्या एका मित्राच्या कुटुंबातील मुलाचा त्या आंदोलनात मृत्यू झाला. "आम्ही व्हिडीओमध्ये पाहिलं की लोकांना कसं मारलं जात होतं. हे सगळे आमचे भाऊ-बहिणी आहेत. या आंदोलनांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक मुलांचाही जीव गेला. मात्र या घटनांबाबत जगभरात फारशी चर्चा झाली नाही. आता जेव्हा युद्धादरम्यान शाळेतील ४० मुलांचा जीव गेला, तेव्हा मात्र सगळीकडे चर्चा होत आहे", असं म्हणत तिनं इराणच्या दुटप्पीपणावर बोट ठेवलं.
पुढे ती म्हणाली, "इराणमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तिथे दरवर्षी सुमारे ५० टक्के महागाई वाढते, अनेक तलाव आणि जलस्रोत आटले आहेत, तर काही भागात दररोज ८ ते ९ तास वीजपुरवठा बंद केला जातो. लोकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. अनेक लोकांकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत आणि संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे". एलनाजच्या मते, सरकार पैसे कमवण्यासाठी बिटकॉइन माइनिंगसाठी वीज वापरतं आणि सामान्य नागरिकांना वीजपुरवठा बंद ठेवला जातो.