"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:38 IST2025-12-29T11:32:24+5:302025-12-29T11:38:56+5:30
इमरान खान सध्या बॉलिवूड सिनेमांपासून दूर आहे. अशातच एका मुलाखतीत इमरानने मनातील खदखद व्यक्त केली आहे

"फक्त ठराविक बजेट होतं म्हणून मला कास्ट केलं..."; इतक्या वर्षांनी इमरान खानने सांगितली मनातील खंत
बॉलिवूड अभिनेता इमरान खान हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांपासून इमरान खानबॉलिवूडपासून दूर आहे. इमरान आता जानेवारी २०२६ मध्ये एका नवीन सिनेमामधून आपल्या भेटीला येणार आहे. इमरानने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. काय म्हणाला इमरान?
इमरानने शेअर केली मनातील खदखद
समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत इमरान खान म्हणाला, ''मी मटरु की बिजली का मंडोला या सिनेमात काम केलं. या सिनेमात एका हरयाणवी गावकऱ्याच्या भूमिकेत माझी निवड करणं ही खूप विचित्र गोष्ट होती. पण नंतर मला यामागची खरी गोष्ट कळाली. याआधी अजय देवगण या सिनेमाशी जोडला गेला होता. अजयने त्याची तयारीही सुरु केली होती.''
''परंतु एका क्षणी अजयने माघार घेतली. विशाल भारद्वाज हा सिनेमा करण्यासाठी खूप उत्सुक होता. मेरे ब्रदर की दुल्हन आणि दिल्ली बेल्ली या हिट सिनेमानंतर माझी या सिनेमासाठी निवड झाली. पण मी एक चांगला अभिनेता आहे म्हणून माझी या सिनेमासाठी निवड झाली नाही, तर त्यांना एका ठराविक बजेटमध्ये हा सिनेमा बनवायचा होता''
"कलाकारांची निवड ही गोष्ट संपूर्णपणे बजेटवर अवलंबून असते. त्याचा अभिनेत्याशी काहीही संबंध नसतो. तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात की नाही, याची कोणालाच पर्वा नसते. ते फक्त असा विचार करतात की, 'या नटाच्या नावावर मला किती पैसे मिळू शकतात?'"
"अशाच प्रकारे माझी 'मटरू' चित्रपटासाठी निवड झाली. माझ्या नावावर त्यांना ठराविक रक्कम मिळू शकणार होती. एक अभिनेता म्हणून तुम्ही उत्साही असता आणि विचार करता की, 'विशाल भारद्वाज मला बोलावतायत.' त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमचं सर्वोत्तम काम कराल. मला असं वाटतं की त्यांनी मला कास्ट करण्यामागे एक क्रिएटिव्ह कारण नसून एक स्वार्थी व्यावसायिक कारण होतं. त्यांनी मला 'ॲक्शन' आणि 'कट' या पलीकडे कधीच काहीही सांगितलं नाही.''