"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना हलक्यात घेतलं जातं...", राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मोठं विधान, सांगितली सत्य परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:11 IST2026-03-13T15:45:30+5:302026-03-13T16:11:07+5:30
"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना इथे मान नाही...", प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगतली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाले...

"कॉमेडी सिनेमे बनवणाऱ्यांना हलक्यात घेतलं जातं...", राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचं मोठं विधान, सांगितली सत्य परिस्थिती
Director Priyadarshan: माणसाच्या जीवनातील ग्रे शेड विनोदी अंगाने पडद्यावर मांडणाऱ्या मोजक्या दिग्दर्शक व पटकथालेखकांमध्ये प्रियदर्शन यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. प्रियदर्शन भारतीय चित्रपटसृष्टीत ४० वर्षांपासून दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून काम करत आहे. त्यांनी प्रामुख्याने मल्याळम, तमिळ, हिंदी आणि तेलुगू या ४ भारतीय भाषांमध्ये ९५ हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते त्यांच्या भूत बंगला या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारची प्रमुख भूमिका आहे. प्रियदर्शन आणि अभिनेता अक्षय कुमार ही जोडी तब्बल १४ वर्षांनंतर 'भूत बंगला' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.
याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विनोदी चित्रपटांच्या दिग्दर्शनाबाबत एक मोठं विधान केलं आहे, ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत. मुलाखतीत त्याने सांगितलं की विनोदी चित्रपटांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली, परंतु विनोदी दिग्दर्शकांना चित्रपटसृष्टीत तितका सन्मान मिळत नाही.
अलिकडे 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले," मला गंभीर विषयांवर आधारित चित्रपट करायला आवडतात. पण, जेव्हा मी विनोदी चित्रपट बनवतो तेव्हा लोक मला एक दिग्दर्शक म्हणून गांभीर्याने घेत नाहीत. परंतु तुम्ही एक गंभीर विषयांवर आधारित चित्रपट बनवले तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये मान, सन्मान दिला जातो." ही गोष्ट त्यांना सर्वात जास्त त्रास देते, असं प्रियदर्शन यांनी मुलाखतीत सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "जेव्हा एखादा दिग्दर्शक विनोदी चित्रपट बनवतो तेव्हा त्याला अनेकदा हलक्यात घेतलं जातं. पण जर तोच दिग्दर्शक गंभीर चित्रपट बनवतो तर लोक त्यांना अधिक आदर देतात.विनोदी चित्रपट बनवणारे लोक चांगले दिग्दर्शक असू शकत नाही का? मला लोकांची ही विचारधारा समजत नाही. विनोदी चित्रपट बनवणंही तितकंच कठीण आहे, तरीही त्याला तेवढं महत्त्व दिलं जात नाही." अशी खंत प्रियदर्शन यांनी व्यक्त केली.
वर्कफ्रंट
२००० मध्ये आलेला 'हेरा फेरी' हा प्रियदर्शन यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. प्रियदर्शन यांना या चित्रपटांसाठी राज्य आणि केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार मिळाले आहेत. त्याचा ऑफबीट चित्रपट कांचीवरमला २००७ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट म्हणून गौरविण्यात आले. त्यांनी मल्याळम भाषेतील कालापानी या चित्रपटाला संतोष सिवन (सिनेमॅटोग्राफी) आणि साबू सिरिल (कला दिग्दर्शन) या पुरस्कारांसह चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. यासह विविध पुरस्कारांसह भारत सरकारच्या माहिती मंत्रालयातर्फे ५० व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ते प्रमुख परीक्षक होते.