"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 14:59 IST2026-03-29T14:56:19+5:302026-03-29T14:59:55+5:30
'धुरंधर' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता रजत अरोराने एका मुलाखतीत सेटवर अक्षय खन्नाची भीती वाटायची, असं मोठं विधान केलंय. काय होतं यामागचं कारण?

"अक्षय खन्नाशी बोलायला भीती वाटायची, कारण ते सेटवर..."; 'धुरंधर' कलाकाराचा मोठा खुलासा, म्हणाला...
रणवीर सिंग आणि आर. माधवन स्टारर 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आहे. या चित्रपटाच्या यशामागे दिग्दर्शक आदित्य धर यांची मेहनत आणि प्रत्येक लहान गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता रजत अरोरा याने एका मुलाखतीत सेटवर अक्षय खन्नाची भीती वाटायची, असं मोठं विधान केलंय. काय होतं यामागचं कारण?
रजतने रणवीर सिंग आणि अक्षय खन्नासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी खुलासा केलाय. तो म्हणाला, ''खूपच छान अनुभव होता. जेव्हा मी रणवीर सरला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांच्याशी कसं बोलू याचाच विचार करत होतो. तितक्यात त्यांनी स्वतःहूनच मला हाक मारली आणि म्हणाले— 'गँगमध्ये तुझं स्वागत आहे, रजत!' त्यांना माझं नाव लक्षात आहे, हे ऐकूनच खूप आश्चर्य वाटलं.''
पुढे रजत अरोराने सांगितले की, पडद्यावर 'रेहमान डकैत' साकारणाऱ्या अक्षय खन्ना यांच्याशी बोलताना तो खूप घाबरत होता. तो म्हणाला, "आम्हाला अक्षय खन्ना सरांची भीती वाटायची, कारण ते नेहमी स्वतःमध्येच मग्न असायचे. आम्हाला वाटायचं की त्यांना कोणाशी बोलायला आवडत नसेल, त्यांना प्रायव्हसी आवडते. दोन दिवस आम्ही पाहिलं की ते सेटवर एकटेच बसून आहेत, त्यांच्या आसपास कोणीही जात नव्हतं. दिग्दर्शक किंवा इतर लोकही त्यांच्याजवळ जायचे नाहीत, तर आपण कशाला जायचं? असं वाटून आम्ही त्यांच्यापासून लांबच राहायचो."
"दोन दिवसांनंतर माझा सह-कलाकार विक्रम म्हणाला की, आपण प्रयत्न तरी करूया, किमान 'हॅलो' तरी म्हणून येऊया. सोबत काम करतोय आणि त्यांचे फॅन असूनही साधं हाय-हॅलो आपण केलं नाही तर काय उपयोग? आम्ही गेलो. आम्ही विक्रमला पुढे केलं. जर काही ओरडा बसला तर तुलाच बसेल, असं विक्रमला सांगितलं. पण तिथे गेल्यावर जे घडलं ते आमच्या कल्पनेच्या अगदी उलट होतं. आम्ही येताच अक्षय सर स्वतः आपल्या जागेवरून उठून उभे राहिले आणि आमच्याशी अतिशय प्रेमाने बोलू लागले.", अशाप्रकारे रजतने 'धुरंधर'च्या सेटवरचा खास किस्सा सांगितला.