चित्रांगदा सिंग पिते 'हे' ड्रिंक, म्हणून पन्नाशी उलटली तरी आहे फिट! फायदे सांगत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:43 IST2026-02-12T17:20:27+5:302026-02-12T17:43:36+5:30
चित्रांगदानं स्वतः तिच्या सौंदर्याचे एक नैसर्गिक आणि सोपे गुपित उघड केले आहे.

चित्रांगदा सिंग पिते 'हे' ड्रिंक, म्हणून पन्नाशी उलटली तरी आहे फिट! फायदे सांगत म्हणाली...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे वय त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखणे कठीण होते. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग.बॉलिवूडमधील फिटनेस आयकॉन्सच्या यादीमध्ये चित्रांगदा हिचे नाव नेहमी घेतलं जात. चित्रांगदा सिंग आपल्या अभिनयाबरोबरच फिटनेस, हेल्थ आणि सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेताना दिसते. वयाच्या ५० नंतरही तिची सुंदर त्वचा आणि सडपातळ बांधा पाहून अनेकजण विचारात पडतात. चित्रांगदा सिंग फिट राहण्यासाठी तिच्या डेली रुटीनमध्ये काही नैसर्गिक व घरगुती ड्रिंक पिते. हे फक्त पचनासाठीच नव्हे, तर डिटॉक्स आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतं. तिनं चाहत्यांसोबत या ड्रिंकची रेसपी शेअर केली आहे.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदाने सांगितले की, ती गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक खास आरोग्यदायी ज्यूस पित आहे. याची चव जरी थोडी विचित्र वाटली तरी त्याचे फायदे अफाट आहेत. अर्धं कारलं, एक संपूर्ण बीट, पाच आवळे हे वापरून ती हे खास ज्यूस बनवते. हा ज्यूस बनवण्यासाठी ती कोल्ड-प्रेस पद्धतीचा वापर करते, जेणेकरून त्यातील फायबर आणि पोषक तत्वे टिकून राहतील. तिच्या मते, हा रस केवळ त्वचेसाठीच नाही, तर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
पहिल्यांदा पिणाऱ्यांना चित्रांगदाचा मोलाचा सल्ला
जर तुम्ही हा ज्यूस पहिल्यांदाच पिणार असाल, तर चित्रांगदाने एक मजेशीर पण महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ती म्हणते, "हा ज्यूस पिल्यानंतर किमान दोन तास घराबाहेर पडू नका". याचे कारण असे की, हा ज्यूस शरीर जलद गतीने स्वच्छ करतो, ज्यामुळे सुरुवातीला वारंवार वॉशरूमला जावे लागू शकते. एकदा शरीराला सवय झाली की सर्व काही सामान्य होते.
त्वचेच्या काळजीबद्दल बोलताना चित्रांगदाने स्पष्ट केले की, "खरे सौंदर्य आतून येते. जर तुमची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसतील, तर महागड्या क्रीम्स किंवा फेशियलचा फारसा उपयोग होत नाही. चांगले खाणे, वेळेवर खाणे आणि हिरव्या भाज्यांचा रस पिणे या गोष्टी जेव्हा तुमची जीवनशैली बनतात, तेव्हाच त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो". पोट आणि शरीर आतून स्वच्छ असेल तर चेहरा आपोआप चमकतो, असे तिने सांगितले.