"इक्कीस सिनेमा आमच्यासाठी...", धर्मेंद्र यांच्या आठवणीने 'बिग बी' झाले भावुक, 'शोले'तील किस्सा सांगत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:24 IST2026-01-01T10:20:19+5:302026-01-01T10:24:59+5:30
धर्मेंद्र यांच्या आठवणीने 'बिग बी' झाले भावुक! चाहत्यांचेही डोळे पाणावले, बघा व्हिडीओ

"इक्कीस सिनेमा आमच्यासाठी...", धर्मेंद्र यांच्या आठवणीने 'बिग बी' झाले भावुक, 'शोले'तील किस्सा सांगत म्हणाले...
Amitabh Bachchan Talking About Dharmendra: अगस्त्य नंदा आणि धर्मेंद्र स्टारर 'इक्कीस' (Dharmendra) हा बहुचर्चित सिनेमा हा आज १ जानेवारी २०२६ सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे,कारण हा त्यांचा कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट आहे. दुर्दैवाने हा चित्रपट रिलीज होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे असंख्य चाहत्यांच्या भावना या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत. प्रदर्शनापूर्वीच, हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टपासून ते कथेपर्यंत, सर्वच बाबतीत प्रचंड चर्चेत राहिला आहे.
अलिकडेच 'इक्कीस' चित्रपटाच्या टीमने 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हजेरी लावली.यादरम्यान दिवंगत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सोशल मीडियावर सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बी म्हणतात,"'इक्कीस' हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान व्यक्तिमत्त्वाने आपल्या लाखो चाहत्यांसाठी मागे सोडलेली एक शेवटची मौल्यवान आठवण आहे.एका कलाकाराला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कला जोपासतो आणि माझे मित्र धर्मेंद्र यांनीही हेच केलं.'धरमजी फक्त एक व्यक्ती नव्हते, ते एक भावना होते, आणि भावना ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या हृदयातून कधीही दूर होत नाही. त्या आठवणी, आशीर्वाद बनतात आणि त्या तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात."
बिग बींनी शेअर केला तो खास किस्सा...
या शोदरम्यान, धर्मेंद्र यांचा आठवणीतला किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "जेव्हा 'शोले'चं शूट सुरू होतं, तेव्हा आम्ही बंगळूरमध्ये काम करत होतो, आणि त्यांच्यामध्ये एक अनोखा गुण होता.तो एक पैलवान होता, त्याची शरीरयष्टी अप्रतिम होती... एकदा मी याचा अनुभवही घेतला, जेव्हा सिनेमात एका मृत्यूच्या सीनदरम्यान मी वेदनेने विव्हळत होतो. कारण, त्याने मला इतकं घट्ट धरलं होतं की, तो त्रास खराच वाटत होता. ते फक्त त्याच्यामुळेच घडलं होतं."असा किस्सा अमिताभ बच्चन यांनी शेअर केला.
श्रीराम राघवन यांचा 'इक्कीस' या सिनेमातून भारतीय सेनेच्या शौर्याची आणि अरुण खेत्रपाल यांच्या बलिदानाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.हा बहुचर्चित चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील 'बसान्तरच्या लढाई'वर आधारित आहे.या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया असे कलाकार आहेत.