मित्राचा अपमान जिव्हारी लागला! भर पार्टीत संतापलेल्या अक्षयने एका व्यक्तीला लगावली होती कानशिलात, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:43 IST2026-02-14T16:41:29+5:302026-02-14T16:43:15+5:30
"तो बेशुद्ध पडला आणि...", मित्राचा अपमान जिव्हारी लागला, भर गर्दीत संतापलेल्या अक्षयने केलेलं असं काही...

मित्राचा अपमान जिव्हारी लागला! भर पार्टीत संतापलेल्या अक्षयने एका व्यक्तीला लगावली होती कानशिलात, काय घडलेलं?
Akshaye Kumar: आजच्या डिजिटल युगात प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’. सध्या हा शो प्रचंड चर्चेत आहे. नॉस्टॅल्जियाची जोड, नामांकित सेलिब्रिटींची उपस्थिती, उत्स्फूर्त संवाद आणि अनपेक्षित घडामोडी यांमुळे या कार्यक्रमाने ओळखीचा पण तरीही नव्या उत्साहाने भरलेला असा फॉरमॅट सादर केला आहे. याचनिमित्ताने ‘शार्क टँक इंडिया’ विशेष भागात अमन गुप्ता, अनुपम मित्तल आणि नमिता थापर अशी मान्यवर मंडळी सुपर होस्ट अक्षय कुमार यांच्यासोबत मंचावर उपस्थित असणार आहेत.याचदरम्यान कार्यक्रमातील एक अत्यंत लक्षवेधी आणि चर्चेचा विषय ठरलेला क्षण समोर आला आहे.
यावेळी रॅपिड-फायर फेरीत अमन गुप्ता यांनी अक्षय कुमार यांना विचारले,“तुमच्या आयुष्यात घडलेला एखादा क्षण ज्यामुळे तुम्हाला आजही वाईट वाटतं."या प्रश्नाचं अक्षय कुमारने अगदी प्रामाणिकपमे उत्तर दिलं. यावेळी अक्षयने अनेक वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा शेअर केला. एका समारंभात तो आपल्या जिवलग मित्रासोबत उपस्थित होता. त्यादरम्यान, तिथे काही कारणास्तव वाद झाला.एका व्यक्तीने त्यांच्या मित्राविषयी वारंवार अपमानास्पद भाषा वापरण्यास सुरुवात केली.
काय घडलेलं?
त्या घटनेबद्दल सांगताना अक्षय कुमार म्हणाला, “त्याने एकदा अपशब्द वापरला, मी त्याला थांबवले. पुन्हा तसेच झाले. तिसऱ्यांदा देखील तसेच झाले. मी चार-पाच वेळा इशारा दिला, तरीही तो थांबला नाही,” असं अक्षय कुमारने सांगितलं.आपल्या मित्राचा वारंवार अपमान होत असल्याने संतापाच्या भरात त्याने त्या व्यक्तीला झापड मारली, आणि तो व्यक्ती काही काळासाठी बेशुद्ध पडला.
मग अक्षय पुढे म्हणाला, “तो अत्यंत मोठा समारंभ होता. माझा मित्र अपमानित झाल्याने भावनिक झाला होता. आम्ही त्या व्यक्तीवर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो." सुदैवाने, काही क्षणांतच त्या व्यक्तीला शुद्ध आली.आज या घटनेकडे पाहताना अक्षय कुमारने स्पष्ट शब्दांत ती चूक असल्याचं मान्य केलं.
“आज अशी परिस्थिती उद्भवली असती, तर मी निश्चितच वेगळा निर्णय घेतला असता. माझ्यासाठी तोच खरा ‘गजब बेइज्जती’ क्षण होता. जो बदलण्याची संधी मिळाली असती तर मी नक्की बदलला असता. आज मी शांतपणे त्या ठिकाणाहून निघून गेलो असतो,” असं त्याने यावेळी सांगितलं.