"रस्त्याने चालतांना तुझ्याकडे कोणी बघत पण नाही", आयुष शर्माला वडिलांनीच केलं होतं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 10:54 IST2026-04-11T10:53:14+5:302026-04-11T10:54:10+5:30
Ayush sharma: अभिनय क्षेत्रात येणाऱ्या आयुषला वडिलांनी कडाडून विरोध केला होता.

"रस्त्याने चालतांना तुझ्याकडे कोणी बघत पण नाही", आयुष शर्माला वडिलांनीच केलं होतं ट्रोल
'लवयात्री' या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे आयुष शर्मा. अभिनेता सलमान खानचा मेहुणा असूनही आयुषला इंडस्ट्रीतील स्ट्रगल काही चुकला नाही. त्याचा पहिला सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. विशेष म्हणजे आयुषने इंडस्ट्रीत येऊ नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आयुषच्या या निर्णयाचा विरोधही केला होता. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं.
आयुषने २०१८ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्या घरातल्यांना जराही पटला नव्हता. इतकंच नाही तर त्याच्या वडिलांनी कठोर शब्दांत त्याचा विरोधही केला होता. ज्यावेळी मी पहिल्यांदा माझ्या वडिलांना अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा असल्याचं सांगितलं तेव्हा ते प्रचंड चिडले होते. सायरस ब्रोचा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आयुषने याविषयी भाष्य केलं.
''मी जय हिंद कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असतांना माझ्या वडिलांना कॉलेजमधून फोन आला आणि तुमच्या मुलांची हजेरी केवळ 9% आहे असं सांगितलं. कॉलेजमधून फोन आल्यामुळे माझे वडील तातडीने मुंबईला आले. त्यांना त्यावेळी माझी प्रचंड लाज वाटत होती. माझ्या आईला सुद्धा या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं सांग, ज्यामुळे तू आज लाजेने आमची मान खाली घालतोयेस. आम्ही सगळ्या परिवाराला सांगितलंय की आमचा मुलगा मुंबईत शिकतोय, तो काही तरी चांगलंच करेल. पण तू तर.. असं मला आई सतत म्हणत होती. त्याचवेळी मी माझ्या वडिलांना मला अॅक्टिंग करायची आहे असं सांगितलं. आणि, माझे काही मॉडलिंगचे फोटो, अॅक्टिंगचे व्हिडीओसुद्धा दाखवले. पण त्यांना त्याचा काहीही फरक पडला नाही,'' असं आयुष म्हणाला.
तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी मी ५० रुपये सुद्धा देणार नाही
''मला वाटलं माझा निर्णय ऐकून ते मला पाठिंबा देतील. मात्र, सगळं उलटच झालं. त्यांनी माझीच शाळा घेतली. ना तुझी उंची चांगली आहे नाही शरीरयष्टी. तुझा आवाजही काही खास नाही. आणि, त्यात तू फार सुंदरही नाहीस. हे सगळे सोड पण तुझी पर्सनालिटी सुद्धा तितकी चांगली नाही. जेव्हा तू रस्त्यावर चालतोस तेव्हा तुझ्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. तू अभिनेता होऊ शकतोस असं कधी कोणी तुला म्हटलंय का? तू धर्मेंद्र, बच्चन साहब यांच्या आसपास सुद्धा नाही. त्यामुळे तू कधीही हिरो होऊ शकणार नाहीस. आणि, तुला स्क्रीनवर बघण्यासाठी तर मी ५० रुपये सुद्धा खर्च करणार नाही. आजपर्यंत मी तुला खूप सपोर्ट केला. पण, यापुढे नाही. तुझं सामान उचल आणि हिमाचलला घरी चल तिकडेच बिझनेस कर'', असं आयुषच्या वडिलांनी त्याला स्पष्ट शब्दांत सांगितलं.
दरम्यान, वडिलांनी पाठ फिरवल्यानंतर आयुषला त्याच्या मित्रांनी बरीच आर्थिक मदत केली होती. त्यावेळी त्याच्या एका मित्राला ५० हजारांची नोकरी लागली होती. मात्र, आयुषसोबत घडलेला प्रसंग कळल्यानंतर त्याच मित्राने आयुषच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केले होते. आयुषने ९ वर्षात फक्त ३चं सिनेमा केले आहेत. परंतु, त्याचे हे तीनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटले.