अर्जुन कपूरला झालं काय? अभिनेत्याची स्टोरी पाहून नेटकरी म्हणाले, "याला नैराश्य आलंय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:51 IST2026-04-09T16:49:45+5:302026-04-09T16:51:46+5:30
अर्जुन कपूरला झालंय तरी काय?

अर्जुन कपूरला झालं काय? अभिनेत्याची स्टोरी पाहून नेटकरी म्हणाले, "याला नैराश्य आलंय..."
अभिनेता अर्जुन कपूर शेवटचा 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमात दिसला. सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं. मात्र नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टवरुन तो नैराश्यात गेल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला. नक्की काय आहे अर्जुनची पोस्ट?
अर्जुन कपूर मधल्या काळात मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. दोघं लग्न करणार अशीही चर्चा होती. मात्र अचानक त्यांचं नातं तुटलं. अर्जुन कपूरला आईच्या निधनाचाही मोठा धक्का बसला होता. त्यात मलायकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो आता नैराश्यातच गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. याचं कारण म्हणजे त्याची पोस्ट. अर्जुनने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "गोष्टींचा शेवट तुझ्या मनासारखा झाला नसला, तरी तो मान्य करायला शिक."

अर्जुनच्या या पोस्टवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर (Reddit) अनेक युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'अर्जुन सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असावा; रोहित शेट्टीच्या चित्रपटामुळे त्याच्या करिअरला थोडी गती मिळाली होती, पण आता इंडस्ट्रीत त्याला विशेष स्थान मिळत नसल्याचे चित्र आहे'. तर दुसऱ्या एका युजरने अर्जुनला हा 'टॉक्सिक शोबिझ' सोडून प्रसिद्धीच्या झोतातून दूर जाऊन स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

सतत होणारी ट्रोलिंग आणि व्यावसायिक पातळीवर अपेक्षित यश न मिळणे हे अर्जुनच्या अस्वस्थतेचे मुख्य कारण असावे, असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर अर्जुनचे त्याच्या बहिणीसोबत खटके उडाले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. अर्जुन सध्या एका कठीण टप्प्यातून जात असल्याचे त्याच्या पोस्टवरून स्पष्ट जाणवत असल्याचे अनेकांचे मत आहे.
विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करतानाही अर्जुनने अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी त्याने आयुष्य गेल्या काही दिवसांपासून आपल्याशी खूप क्रूर वागत असल्याचे लिहिले होते. वारंवार अशा भावूक पोस्ट समोर येत असल्याने अर्जुन नक्की कोणत्या संकटाचा सामना करत आहे, याबाबत चाहत्यांमध्ये काळजी व्यक्त केली जात आहे.