"दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले..." अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले "काश्मिरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:14 IST2025-06-01T14:14:10+5:302025-06-01T14:14:24+5:30
अनुपम खेर यांनी काश्मिरी पंडितांच्या इतिहासातील सर्वांत वेदनादायी रात्रींच्या आठवणींना उजाळा दिला.

"दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले..." अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले "काश्मिरी..."
Anupam Kher: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे सातत्याने चर्चेत असतात. काश्मिरी पंडित कुटुंबात जन्मलेले अनुपम खेर विविध व्यासपीठांवर सामाजिक विषयांवर खुलेपणाने बोलताना दिसतात. अलिकडेच त्यांनी २२ एप्रिल रोजी झालेला पहलगाम हल्ला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसेच मुंबई २६/११ हल्ल्याच्या काळातील नेतृत्वाचा अप्रत्यक्षपणे निषेध केला.
अनुपम खेर यांनी अलीकडेच इंडिया टुडेशी बोलताना काश्मिरी पंडितांच्या इतिहासातील सर्वांत वेदनादायी रात्रींच्या आठवणींना उजाळा दिला. १९ जानेवारी १९९० च्या रात्री त्यानं घर सोडावं लागलं होतं. या प्रसंगाची आठवण करत ते म्हणाले, "मी दहशतवादाचा बळी आहे. माझे कुटुंब दहशतवादाचे बळी आहे. ३२ वर्षांपासून, काश्मिरी पंडितांच्या बाबतीत काहीच बदललेलं नाही, ज्यांना ज्यांना १९ जानेवारी १९९० रोजी एका रात्री आपले घर सोडावे लागले. आणि मग, कलम ३७० रद्द झाल्यानंतर, असेच काहीतरी घडत आहे. याबद्दल मला असहाय्य वाटणे थांबले आहे".
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर एका महिलेचा तिच्या मृत पतीशेजारी बसलेला हृदयद्रावक फोटो पाहून खेर यांच्या मनात रागाची भावना निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "तो फोटो पाहून मला सामान्य भारतीयासारखा राग आला. आता असहाय्य वाटत नाही".
अनुपम खेर यांनी मोदी सरकारच्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईचं समर्थन केलं. ते म्हणाले, "सरकारकडून किंवा नेतृत्वाकडून कारवाईची अपेक्षा असते. जेव्हा त्यांनी कारवाई केली तेव्हा मला वाटले की मी दोषी आहे. ते योग्य आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु मला असे वाटले की ते असेच व्हायला हवे होते. दोन दिवसांतच आम्हाला तिथे काय घडले हे कळले. लोकांचे अनेक तर्क-वितर्क आहेत, परंतू, आता आम्हाला तो हल्ला किती अचूक होता हे कळत आहे".
पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करण्यात आल्याबद्दल त्यांनी भारतीय सैन्य व गुप्तचर यंत्रणांचे कौतुक केलं. ते म्हणाले, "आपले सैन्य किती ताकदवान आहे हे आता जगाला समजले आहे". तसेच त्यांनी मुंबई २६/११ हल्ल्याच्या काळातील नेतृत्वाचा अप्रत्यक्षपणे निषेध केला. अनुपम खेर म्हणाले, "दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडलं, तेव्हाच्या नेतृत्वाने त्या हल्ल्याबद्दल काहीही केले नाही आणि ते दुर्दैवी होते. आता आपल्याला माहिती आहे की, आज आपल्याकडे असे नेते आहेत जे गोष्टी हलक्यांमध्ये घेत नाहीत, निर्णय घेतात".