'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 07:28 PM2023-05-07T19:28:22+5:302023-05-07T19:29:08+5:30
Salman khan: २००२ मध्ये ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सलमानवर शारीरिक, मानसिक हिंसाचाराचे आरोप केले होते.
![aishwarya rai once accused salman khan of domestic violence infidelity | 'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण aishwarya rai once accused salman khan of domestic violence infidelity | 'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/salman-aish_2023051015361.jpg)
'मी तिला मारलं असतं तर ती वाचली नसती'; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमानचं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) आणि ऐश्वर्या राय- बच्चन (aishwarya rai) यांच्या लव्हस्टोरीविषयी फार काही सांगायला नको. आजही त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगते. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीने ब्रेकअप केला आणि त्यानंतर ऐश्वर्याने सलमानवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. या आरोपांवर सलमानने इतक्या वर्षानंतर प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच ऐश्वर्याने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं त्याने म्हटलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सलमानने ऐश्वर्याने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं. 'तू कधी कोणत्या महिलेवर हात उचलला आहेस का?' असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर कोणाचंही नाव न घेता त्याने ऐश्वर्यावर भाष्य केलं.
'दोन्ही बाजूने होकार येईल तेव्हा मी लग्न करेन'; अखेर भाईजानला मिळाली लाइफ पार्टनर
"आधीच एका महिलेने मी हे केलं आहे, असं सांगितलं आहे. त्यामुळे आता मला त्यात पडायचं नाहीये. काही वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मला हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी टेबलावर हात मारला होता ज्यामुळे तो टेबल तुटला. हा प्रकार पाहून तो पत्रकार खूप घाबरला होता. थोडक्यात, मला असं सांगायचं होतं की जर माझं कोणासोबत भांडण झालं आणि मी त्यांना मारलं तर त्याचा काय परिणाम होईल. मी तिला अजून जोरात मारलं असतं तर ती त्यातून वाचली असती असं वाटत नाही. त्यामुळे ते खरे नाही. हे कोणत्या कारणास्तव ती बोलली ते मला माहीत नाही,' असं सलमान म्हणाला.
'अरे छोडो यार...'अनेकांचं करिअर उद्धवस्त केल्याच्या आरोपावर सलमानची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, २००२ मध्ये ऐश्वर्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सलमानवर शारीरिक, मानसिक हिंसाचाराचे आरोप केले होते. तिच्या या आरोपांनंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली होती.