'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 13:54 IST2026-04-04T13:53:30+5:302026-04-04T13:54:16+5:30
आदित्य आगामी तीन बड्या प्रोजेक्ट्सवर विचार करत असल्याची चर्चा आहे.

'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
आधी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' आणि आता 'धुरंधर'मधून आदित्य धरने प्रेक्षकांवर कमालीचा प्रभाव पाडला आहे. जगभरातून सिनेमाचं विशेष कौतुक होत आहे. तसंच आता त्याच्या पुढील सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आदित्य यानंतर कोणत्या प्रोजेक्टवर काम करणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यातच आता तो पुन्हा रणवीर सिंहसोबत काम करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या रेकॉर्डतोड कमाईनंतर आदित्य धरच्या पुढील प्रोजेक्टची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. आदित्य आगामी तीन बड्या प्रोजेक्ट्सवर विचार करत असल्याची चर्चा आहे. व्हरायटी इंडिया रिपोर्टनुसार, या सिनेमांमध्ये एक 'द इमॉर्टल अश्वत्थामा' आहे. यानंतर तो चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर सिनेमा आणण्याच्या विचारत आहे. तसंच एका स्पोर्ट्स ड्रामा फिल्मही तो काम करणार आहे. त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र त्याआधी तो ब्रेक घेणार आहे. ब्रेकनंतरच तो पुढील सिनेमाची तयारी करणार आहे.
'धुरंधर'साठी आदित्य धरने रणवीर सिंहसोबत ३ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं. आता त्याचा पुढचा सिनेमाही बिग स्केल असणार आहे. तसंच तो पुन्हा रणवीर सिंहसोबत काम करु शकतो असंही रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. मौर्य साम्राज्यावर आधारित ऐतिहासिक सिनेमावर तो काम करणार आहे. याविषयी तो गेल्या वर्षभरापासूनच रणवीर सिंहसोबत चर्चा करत आहे. 'धुरंधर'च्या यशानंतर आता ही आशा आणखी पल्लवित झाली आहे.
दुसरीकडे आदित्य धरच्या 'अश्वत्थामा'चं काम मध्यंतरी थांबलं होतं. सिनेमा बंदच पडला अशीही चर्चा झाली. बजेटच्या कारणामुळे सिनेमा रखडला होता. मात्र आता 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवरील यश पाहता 'अश्वत्थामा'चं काम पुन्हा सुरु होईल अशी शक्यता आहे. मात्र तोपर्यंत आदित्य ऐतिहासिक ड्रामा सिनेमाचंच काम सुरु करेल.