"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:02 IST2026-02-27T17:01:00+5:302026-02-27T17:02:18+5:30
"...तर माझ्यासारख्या कलाकारांनी कुठे जायचं?", ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेत्याने व्यक्त केली खंत

"धुरंधर अन् बॉर्डर-२ बघा, पण..." ‘तू या मैं’ च्या अपयशावर मुख्य अभिनेता स्पष्टच बोलला, प्रेक्षकांना म्हणाला...
Tu Ya Main Movie: बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित ‘तू या मैं’ हा सिनेमा अलिकडेच १३ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. शनाया कपूर आणि आदर्श गौरव ही फ्रेश जोडी या चित्रपटात पाहायला मिळतेय. जेन झी वाईब्स देणारा हा सिनेमा आहे. तरुण मुलगा आणि मुलीची ही कहाणी आहे. हॉरर, रहस्यमय आणि गुढ कथानक असलेल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. यावर पहिल्यांदाच अभिनेता आदर्श गौरवने प्रतिक्रिया दिली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दरम्यान, ‘तू या मैं’ चित्रपटासोबतचा अभिनेता शाहिद कपूरचा ओ रोमियो देखील प्रदर्शित झाला. शाहिदच्या "ओ रोमियो" चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु ‘तू या मैं’ पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. फक्त २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बजेटच्या अर्धी रक्कम सुद्धा वसूल करता आली नाही. यावर बोलताना मुख्य अभिनेता आदर्श म्हणाला,'लोकांनी 'धुरंधर'सारखे मोठ्या बॅनरचे चित्रपट नक्कीच बघावेत. पण, त्यांनी छोट्या व्यावसायिक चित्रपटांनाही पाठिंबा देणं तितकंच महत्वाचं आहे.' अशी खंत अभिनेत्याने यावेळी व्यक्त केली.
'झुम'ला दिलेल्या मुलाखतीत आदर्श गौरव म्हणाला, प्रेक्षकांनी कोणताही सिनेमा प्रत्यक्षात न पाहता किंवा त्याबद्दल विचार न करता फक्त फॅशन स्टेटमेंट म्हणून टीका करु नये. जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल आणि तुम्हाला तो आवडला नसेल, तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे.पण कमीत कमी आधी ते तरी पहा,त्यासाठी आम्ही किती मेहनत घेतली आहे ते समजून घ्या.हो, हा चित्रपट रिमेक आहे, पण आमच्या लेखकांनी ते अतिशय वेगळ्या पद्धतीने ही कथा लिहिली आहे. ज्या लोकांनी दोन्ही चित्रपट पाहिले आहेत ते माझ्याकडे आले आहेत आणि म्हणाले की, हा सिनेमा मुळ कथेपेक्षा वेगळा आहे.म्हणून मला वाटतं की लोकांनी ते एक संधी देऊन पाहावं. छोटे व्यावसायिक चित्रपट पाहणे देखील खूप महत्वाचं आहे."
मग अभिनेता म्हणाला, "कोरोना महामारीनंतर प्रेक्षक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांकडे वळले आहे. त्यांना अॅनिमल, बॉर्डर २ किंवा धुरंधर सारखे चित्रपट हवे आहेत. पण त्याच वेळी, मला असे वाटते की या छोट्या चित्रपटांसाठीही लोकांनी काही प्रमाणात थिएटरमध्ये यावं... मी असं म्हणत नाही की या चित्रपटांनी खूप पैसे कमवावेत, पण जर असंच नुकसान होत राहिलं तर पुढे निर्माते वेगळे प्रयोग करण्यात धजावणार नाहीत.मग माझ्यासारखे कलाकार कुठे जातील? आता ओटीटी प्लॅटफॉर्म असा विचार करू लागले आहेत." अशी खंत अभिनेत्याने व्यक्त केली.
आदर्श गौरव आणि शनाया यांचा 'तू या मैं' हारिमेक आहे. सुरुवातीला रोमँटिक सुरु असलेली गोष्ट नंतर भयावह वळण घेते. पाण्यात दोघंही कॅमेऱ्यासमोर बोलत असतात तेवढ्यात तिथे मगरही येते. हा भयावह सीन पाहून धडकीच भरते. आनंद एल राय यांनी सिनेमाची निर्मिती केली असून बिजॉय नाम्बियार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.