लोकप्रिय अभिनेत्याच्या वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या, एका घटनेने बदललं कलाकाराचं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 09:47 IST2026-04-06T09:46:48+5:302026-04-06T09:47:32+5:30
Bollywood actor: जाणून घ्या, सध्या काय करतोय हा अभिनेता

लोकप्रिय अभिनेत्याच्या वडिलांची दहशतवाद्यांनी केली हत्या, एका घटनेने बदललं कलाकाराचं आयुष्य
कलाविश्वातील कालाकारांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. यात काही कलाकारांच्या जीवनाची कहानी तर इतकी हृदयस्पर्शी आहे की त्यांची कथा एखाद्या सिनेमाला साजेशी आहे. अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी स्ट्रगल केला. यात काहींनी तर अनेक कौटुंबिक समस्यांचा सामना केला. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. मूळचा कश्मिरी पंडित असलेल्या या अभिनेत्याच्या वडिलांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
संजय सुरी हे नाव आज अनेकांना ठावूक असेल. दिल विल प्यार व्यार, राजी, चलो इश्क लडाए, बारामूला अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये संजय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारे संजय सुरी हे मूळचे कश्मिरी पंडित. काश्मीरमध्ये लहानाचे मोठे झालेल्या संजय सुरी यांनी वडिलांच्या हत्येनंतर काश्मीर सोडलं आणि मुंबई गाठली. त्यानंतर इथेच त्यांनी करिअरची सुरुवात केली.
संजय सुरी यांनी स्पोर्ट्समध्ये त्यांचं करिअर करायचं होतं. अभिनेता होण्यापूर्वी ते प्रसिद्ध स्क्वॅश खेळाडू होते. परंतु, वडिलांच्या हत्येनंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. संजय यांनी निरमा साबणाच्या जाहिरातीतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या जाहिरातीमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रिया सेन हिने स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर प्यार में कभी-कभी या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकले. हा त्यांचा पहिला सिनेमा होता.
दरम्यान, त्यांनी दामन, फिलहाल, दिल विल प्यार, व्यार, पिंजर यांसारख्या सिनेमात काम केलं. मात्र, म्हणावी तशी लोकप्रियता त्यांना मिळाली नाही. २००३ साली आलेल्या झंकार बीट्स या सिनेमातून ते खऱ्या अर्थाने नवारुपाला आले. अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. आय एम या सिनेमाची निर्मिती त्यांनी केली. विशेष म्हणजे या सिनेमाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. अँटीक्लॉक फिल्म्स हे त्यांचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊसदेखील आहे.