पाकिस्तानमध्ये 'या' कारणामुळे प्रदर्शित झाला नव्हता 'दंगल' सिनेमा, आमिर खान म्हणाला - "त्यांनी राष्ट्रगीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:23 IST2025-06-14T12:14:29+5:302025-06-14T12:23:17+5:30
आमिर खानचा सुपरहिट 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित का झाला नाही? अभिनेता म्हणाला...

पाकिस्तानमध्ये 'या' कारणामुळे प्रदर्शित झाला नव्हता 'दंगल' सिनेमा, आमिर खान म्हणाला - "त्यांनी राष्ट्रगीत..."
Aamir Khan :बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'दंगल' हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतील सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत अनेक विक्रम रचले होते. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जगभरात 'दंगल' चं भरभरुन कौतुक झालं. परंतु, नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला नव्हता. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला आहे.
'दंगल' हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाने जगभरात २००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता.परंतु, पाकिस्तानमध्ये चित्रपट बॅन करण्यात आला होता. याबद्दल सांगताना आमिर खान म्हणाला, "डिस्ने दंगलच्या निर्मात्यांपैकी एक होता,त्यांनी या चित्रपटाला प्रेझेंट केलं होतं. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पाकिस्तानच्या सेन्सॉरने त्यांना गीता फोगाटच्या विनिंग सीनमधून भारतीय राष्ट्रध्वज आणि भारतीय राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितले. जोपर्यंत तो सीन कट केला जात नाही तोपर्यंत चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार नाही. असं त्यांनी म्हटलं होतं."
त्यानंतर अभिनेता म्हणाला,"मी कोणताही विचार न करता त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, आमचा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. मला आता यावर काहीच बोलायचं नाही. माझं बोलणं ऐकून ते म्हणाले, याचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यावर उत्तर देत मी ठामपणे म्हटलं, जर कोणी मला चित्रपटातून आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत काढून टाकण्यास सांगितले तर मला ते मान्य नाही. "असा खुलासा अभिनेत्याने केला.
सध्या आमिर खान त्याच्या 'सितारे जमिन पर' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.या चित्रपटात आमिर खानसह जिनिलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. तसंच आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई,वेदांत शर्मा, आयुष भानुशाली आणि आशीष पेंढसे, ऋषी शहाणी, ऋषभ जैन, नमन मिश्रा,सिमरन मंगेशकर अशा नवोदित कलाकारांची फौज आहे.