ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात भारतानेवेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्टार युवा फलंदाज संजू सॅमसनभारताचा शिल्पकार ठरला. मात्र, विजयानंतरच्या जल्लोषात संजूने केलेल्या एका कृतीमुळे आता त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसनने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ५० चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार ठोकले. संजूच्या या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजचे आव्हान सहज पार केले. सामना जिंकल्यानंतर संजू सॅमसनने आनंदाच्या भरात आपले हेल्मेट मैदानावर फेकले. संजूची ही कृती आयसीसीच्या आचारसंहितेनुसार अयोग्य वर्तनाच्या श्रेणीत येऊ शकते.
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमांनुसार, मैदानावरील खेळाडू, पंच किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. बॅट किंवा हेल्मेटसारख्या वस्तू मैदानावर फेकणे हे शिस्तभंग मानले जाते, कारण यामुळे कोणालाही दुखापत होऊ शकते. या कृत्याबद्दल संजूला मॅच फीच्या काही टक्के दंड, डिमेरिट पॉइंट्स किंवा निलंबनाला सामोरे जावे लागू शकते.
सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी भिडणार
सुपर ८ मधील विजयानंतर आता टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा हाय-व्होल्टेज सामना गुरुवारी (५ मार्च २०२६) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. विशेष म्हणजे, २०२२ च्या टी-२० विश्वचषक सेमीफायनलमध्येही हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळले होते, जिथे इंग्लंडने बाजी मारली होती. आता मुंबईच्या घरच्या मैदानावर भारतीय संघ त्या पराभवाचा बदला घेऊन फायनलचे तिकीट मिळवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.